नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय (एमईए) यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यांना अस्वीकार्य ठरवले आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आधीपासूनच वाढलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो, ज्यामध्ये तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे अस्वीकार्य आहे. भारत संयुक्त अरब अमिरातीसोबत पूर्णपणे एकजुटीने उभा आहे आणि संवाद व कूटनीतीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांचे शांततापूर्ण समाधान करण्यासाठी आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो.”
पश्चिम आशियामध्ये लष्करी तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना मुक्त करण्यासाठी लष्करी मोहिम जाहीर केली आहे. यानंतर ...
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करणे हे प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
होर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने दावा केला आहे की, सोमवारी त्यांनी एका अमेरिकन ...
दरम्यान, यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखले. मात्र फुजैराह येथे झालेल्या एका ड्रोन हल्ल्यामुळे तेल सुविधेत आग लागली. या घटनेत तेथे काम करणारे तीन भारतीय जखमी झाले.दरम्यान, ब्रिटिश सैन्याने समुद्रात दोन जहाजांना आग लागल्याची माहिती दिली आहे. इराणने या हल्ल्याची थेट जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, त्यांचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी अमेरिका आणि यूएईने परिस्थिती अधिक बिघडू नये, याची काळजी घ्यावी असे म्हटले आहे.
इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्यानेही सांगितले की, यूएई किंवा कोणत्याही तेल सुविधेवर हल्ला करण्याची त्यांची कोणतीही योजना नव्हती. त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या लष्करी धोरणांमुळेच हा तणाव वाढत आहे.






