Monday, May 4, 2026

Sunetra Pawar : "विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये"; सुनेत्रा पवार यांची भावनिक साद

Sunetra Pawar :

बारामती : राज्याच्या राजकीय पटलावर अत्यंत संवेदनशील ठरलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान झाले.

बारामतीमधून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बहुमताने विजय मिळवला. तर राहुरीमधून अक्षय कर्डीले यांच्या एकहाती विजयामुळे महायुतीचीच सरशी होत असल्याचे चित्र आहे.

अशातच विजयानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी X वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक साद घातली आहे. "विजयाचा जल्लोष म्हणुन कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये" अशी साद त्यांनी घातली आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.

आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.

दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा