Monday, May 4, 2026

Apurva Nemlekar: लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचं कमबॅक, हॉरर सीरिजच्या प्रोमोची जोरदार चर्चा

Apurva Nemlekar: लग्नानंतर अपूर्वा नेमळेकरचं कमबॅक, हॉरर सीरिजच्या प्रोमोची जोरदार चर्चा

मुंबई: लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयातील वेगळेपणामुळे आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांमुळे ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः तिने साकारलेली 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता' ही भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. दरम्यान, अपूर्वानं अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्टची झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्या व्हिडिओतील तिचा लूक पाहून अनेकांना ‘शेवंता’ची आठवण झाली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत अपूर्वानं ‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज 'एआय'वर आधारित असून तिची प्रस्तुतीदेखील अपूर्वानं स्वतः केली आहे.

“काहीतरी वेगळं, अंतर्मुख आणि सिनेमॅटिक करायचं होतं” – अपूर्वा नेमळेकर

‘एआय’ आधारित सीरिज करण्यामागील कल्पनेविषयी बोलताना अपूर्वा म्हणाली, “आजच्या काळात कंटेंटची कमतरता नाही, पण त्यातही आम्हाला काहीतरी वेगळं, अंतर्मुख करणारं आणि सिनेमॅटिक सादरीकरण करायचं होतं. एआयच्या मदतीनं आम्हाला कल्पनेच्या पलीकडचं व्हिज्युअल स्टोरीटेलिंग साकारता आलं. ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर लोककथा, भीती आणि वास्तव यांचा संगम घडवून ही कथा एका नवीन पद्धतीनं मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर कथाकथनाला एका नव्या स्तरावर नेण्याची संधी आहे. आम्ही काहीतरी वेगळं निर्माण करत आहोत, जे प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करेल.”

सामाजिक आशय असलेली थरारक भयकथा

‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजमधील प्रत्येक भागात वेगवेगळ्या घटनांभोवती फिरणारं कथानक उलगडताना दिसणार आहे. पाऊस, वारा, शांतता अशा विविध वातावरणांमध्ये कथा पुढे सरकते, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. ही सीरिज फक्त भीती निर्माण करणारी नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी आहे, असं अपूर्वा स्पष्ट करते. ती पुढे म्हणाली, “या कथेत अन्याय आणि त्या अन्यायाशी जोडलेल्या आठवणींचं प्रतिबिंब आहे. ‘पद्मिनी’ ही एक शक्ती आहे, जी विस्मरणात गेलेलं सत्य पुन्हा समोर आणते. न्याय विरुद्ध सूड, सामर्थ्य विरुद्ध असुरक्षितता असे अनेक स्तर या कथेत आहेत. ही केवळ भयकथा नसून ती एक सामाजिक भाष्य आहे. कथानकात अनेक रहस्यमय आणि अनपेक्षित वळणं आहेत, जी प्रत्येक भागागणिक उलगडत जातील. सत्ता, अन्याय आणि सत्य यावर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >