Thursday, April 30, 2026

BMC News : विरोधकांचा होता निर्धार पक्का, सत्ताधाऱ्यांना बसला धक्का

BMC News : विरोधकांचा होता निर्धार पक्का, सत्ताधाऱ्यांना बसला धक्का

-वडाळ्यातील गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी विरोधकांनी हाणून पाडली

मुंबई (विशेष प्रतिनिधी )

मुंबई महापालिका सभागृहात आधीच निधी वाटपावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच गुरुवारी महापालिका सभागृहात सुधार समितीत मंजूर झालेल्या वडाळा येथील गुहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाला प्राधान्याने मंजुरी देण्याचा प्रस्तावाला विरोधकांनी जोरदार विरोध केला. आणि सभागृहात विरोधकांचे संख्याबळापुढे सत्ताधाऱ्यांचे संख्या बळ केवळ दोननेच अधिक असल्यामुळे हा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्याचा मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षावरील ही नामुष्की असून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक वेळेवर सभागृहात उपस्थित राहत नसल्याचे पाहून विरोधकांनी आपला निर्धार पक्का करत एकप्रकारे या प्रस्तावाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धक्का दिला.

मुंबई महापालिका सभागृहात गुरुवारी सुधार समितीच्या बैठकी मंजुर करण्यात आलेला वडाळा रफी अहमद किडवाई मार्ग येथील दादर नायगाव विभाग येथील आझाद नगर म्हणून आेळखल्या जाणाऱ्या महापालिकेच्या मालमत्तेचा विकास तसेच लगतच्या कमला नगर म्हणून महापालिकेच्या मालकीच्या झोपडपट्टी व्याप्त भूखंडाचा पुनर्विकासाला मान्यता देण्याचा प्रस्ताव तातडीची बाब म्हणून पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव तातडीची बाब म्हणून अग्रक्रम देण्याची मागणी सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी केल्यानंतर विरोधकांनी यावर पोलची मागणी केली. त्यावर महापौरांनी अनुकूल करता मतदानाला हा प्रस्ताव पुकारला. यावर सभागृृहात भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी अनुकूलच्या बाजुने हात उंचावत मतदान केले. तर उबाठा, काँग्रेस, मनसे, एमआयएम आदींच्या नगरसेवकांन प्रतिकूलच्या बाजुने हात उंचावत मतदान केले. यामध्ये अनुकूलच्या बाजुने ६१ नगरसेवकांनी मतदान केले तर प्रतिकूलच्या बाजुने ५८ नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे महापौरांनी पोलमध्ये दोन तृतीयांश मतदान न झाल्याने हा प्रस्तावाला अग्रक्रम न देता तो राखून ठेवला. त्यामुळे प्राधान्याने या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न फसला गेला. परिणामी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाची एक मोठी नामुष्की मानली जात आहे. एक दिवसांपूर्वीच महापालिका सभागृहात विरोधकांकडून पोल मागितला जाण्याची शक्यता लक्षात घेत असाच एक प्रस्ताव पुकारण्यात आला नव्हता. परंतु भाजप आणि शिवसेनेच्या गटनेत्यांना याची पूर्ण कल्पना असतानाही त्यांच्याकडून एक दिवस आधी पक्षादेश जारी न होणे आणि नगरसेवक उशिराने सभागृहात येणे हे एकप्रकारे सत्ताधारी पक्षाची आपल्याच नगरसेवकांवर पकड नसल्याचे स्पष्ट होते.

विशेष म्हणजे सभागृहात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक संख्या कमी असल्याचे पाहून सभागृहनेते आणि महापौर यांनी हा प्रस्ताव रात्री अर्थसंकल्पाचे कामकाज संपल्यानंतर घेणे योग्य ठरले असते, परंतु सभागृहनेते आणि महापौर यांच्यातही यामधून समन्वय नसल्याचे दिसून आले आहे.

सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव आला असताना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी या ठिकाणाची पाहणी करून निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती तर शिवसेनेचे अमेय घोले यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यास मागील २० वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या भाडेकरुंना न्याय मिळेल असे सांगत हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली होती.त्यामुळे सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी हा प्रस्ताव विरोधकांचा विरोध असतानाही मंजुर केला होता आणि तातडीचे कामकाज म्हणून मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >