Thursday, April 30, 2026

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनले कार्यकारी अभियंता, सभागृहात प्रस्तावाला मंजुरी

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनले कार्यकारी अभियंता, सभागृहात प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (सचिन धानजी)

मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदाची अनेक पदे रिक्त असू स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत या १६५ रिक्त जागी सहायक अभियंत्यांना बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यानंतरगुरुवारी महापालिका सभागृहातही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदी बढती देण्याच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासूनच बढतीसाठी रखडलेल्या अभियंत्यांचे स्वप्न साकार झाले आहेत. तसेच या बढतीमुळे कार्यकारी अभियंतापदाची अनेक रिक्त पदे आता कायमस्वरुपात भरली जावून यापदावर आता प्रभारी ऐवजी कायम कार्यकारी अभियंता विराजमान होणार असल्याने भविष्यात महापालिकेचे कामकाज विना अडथळा आणि सुरळीत पार पाडले जाण्याची शक्यता आहे.

कार्यकारी अभियंता या संवर्गातील १५० रिक्तपदे, ०९ संभाव्य रिक्त पदे आणि ०६ परिणाम स्वरुप रिक्तपदे अशाप्रकारे एकूण १६५ रिक्त पदे ही सहायक अभियंता (स्थापत्य) संवर्गातून पदोन्नतीने भरली जात आहे. ही पदे पदोन्नतीने भरण्यासाठी सेवा ज्येष्ठनेनुसार पदांची यादी तयार करून याच्या मंजुरीसाठी स्थापत्य शहर समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी मंजुरी दिली होती. या समितीच्या मान्यनेनेतर हा प्रस्ताव महापालिकेच्या मान्यतेसाठी अत्यंत तातडीची बाब म्हणून पटलावर ठेवण्यात आला होता, या प्रस्तावाला बुधवारी मान्यता मिळणे अपेक्षित होते. परंतु या प्रस्तावाचा विचार सभागृहात करण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव गुरुवारी महापालिका सभेत तातडीचे कामकाज म्हणून घेण्यात आला. यावेळी प्रशासनाच्यावतीने मांडण्यात आलेल्या या सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता यांच्या बढतीच्या प्रस्तावाला एकमताने मान्यता देण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बढतीचा मार्ग खुला होवून आता खऱ्या अर्थाने कार्यकारी अभियंता पदावर कायमच अधिकारी पहायला मिळणार आहे.

या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते, परंतु लोकसभा आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागून संपुष्टात आल्यानंतरही पात्र अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे ते यापासून वंचित राहिले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा