Tuesday, August 11, 2026

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

Ashish Shelar : झारखंडमधील विद्यार्थी मारहाणीवर राज-उद्धव ठाकरे गप्प का; मंत्री आशिष शेलार यांचा सवाल

 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची भूमिका

मुंबई : झारखंडची राजधानी रांची येथे नोकरभरती प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांवर तेथील सरकारने केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यावर उद्धव आणि राज ठाकरे यांची बोबडी का बंद आहे, असा सवाल भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी उपस्थित केला. झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी असल्यानेच या दोन्ही नेत्यांनी मौन बाळगले असून, 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून स्वतःच्या राजकीय सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलकांवर तेथील प्रशासनाने अत्यंत क्रूरपणे बळाचा वापर केला. रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला आता देशाला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची या संपूर्ण प्रकरणात दुटप्पी भूमिका उघडी पडली आहे, असे शेलार म्हणाले.

रांचीमध्ये ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, ते तरुण-तरुणी आणि विद्यार्थी आपले नाहीत का? महाराष्ट्रात प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावर बोलणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दरवाजे या प्रकरणात का बंद आहेत? विरोधकांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिताचा बळी देऊन आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले आहे. हेच त्यांचे मूळ धोरण असल्याने सध्या संसदेतही विरोधकांकडून 'नौटंकी' आणि गोंधळ घालण्याचे काम सुरू आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना रांचीचे विमानाचे तिकीट काढून पाठवायला तयार आहोत, त्यांनी तिथल्या पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून दाखवावे, असे आव्हानही शेलार यांनी दिले.

'जेएमएम' आणि काँग्रेस सरकारकडून दडपशाही

झारखंडमधील 'जेपीएससी'ची परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपनीला दिले होते, ती कंपनी काळ्या यादीत (ब्लॅक लिस्टेड) कशी काय होती? त्यांनाच हे काम का दिले गेले? तसेच परीक्षेनंतर कोऱ्या सोडलेल्या उत्तरपत्रिका नंतर कोठे भरल्या गेल्या? असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले. या घोटाळ्याविरोधात पारदर्शकता मागणाऱ्या मुलांवर तिथल्या सरकारने शत्रूसारखा हल्ला केला आहे. महिला उमेदवारांवर लाठीचार्ज करणे, अश्रूधूर सोडणे आणि आंदोलकांभोवती तारेचे कुंपण घालणे ही अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धत आहे. तिथे 'जेएमएम'सोबत (झारखंड मुक्ती मोर्चा) काँग्रेसही सत्तेत समान वाटेकरी आहे. मग हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी अमानुष बळाचा वापर कोणाच्या इशाऱ्यावर झाला? राहुल गांधी आता तिथल्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेणार की स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देणार? असा सवाल त्यांनी केला.

राहुल गांधींनी संसदेतून पळ काढू नये

रांचीमधील विद्यार्थ्यांनी कोणत्याही बेकायदेशीर किंवा अश्लील भाषेचा वापर न करता आपल्या न्याय्य मागण्या मांडल्या होत्या. तरीही त्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक का देण्यात आली, याचे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाला दिले पाहिजे. भाजप या पीडित विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. चालू संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी जनतेच्या हिताचा एकही महत्त्वाचा मुद्दा मांडलेला नाही. संसदेत खोटेपणा पसरवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच सभागृहात येऊन या संपूर्ण विषयावर निवेदन देतील आणि विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तरही देतील. त्यामुळे गृहमंत्र्यांचे उत्तर ऐकताना राहुल गांधी यांनी संसदेतून पळ काढू नये, असा खोचक सल्लाही मंत्री शेलार यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >