मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या पायधुनी परिसरातील घाटी गल्लीत एका घटनेने सर्वांचीच झोप उडवली आहे. येथील 'मुघल बिल्डिंग'मध्ये राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. अब्दुल्ला डोकाडिया (वय ४०), त्यांची पत्नी नसरीन (वय ३५) आणि त्यांच्या दोन कोवळ्या मुली आयशा (१६) व झैनब (१३) या चौघांचाही गूढ मृत्यू झाला आहे. सुरुवातीला ही एक दुर्दैवी दुर्घटना वाटत होती, मात्र तपासाची चक्रे फिरताच या प्रकरणात एक मोठा आणि धक्कादायक 'ट्विस्ट' समोर आला आहे. मृत अब्दुल्ला हे एका जुन्या गुन्ह्यातील महत्त्वाचे साक्षीदार होते, ज्यामुळे या मृत्यूंमागे काही काळंबेरं तर नाही ना, अशी शंका आता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...
'फूड पॉयझनिंग' की आणखी काही?
रात्री बिर्याणी आणि त्यानंतर फ्रीजमधले थंडगार कलिंगड खाल्ल्यामुळेच या कुटुंबाला विषबाधा (Food Poisoning) झाली असावी, असा प्राथमिक अंदाज सर्वांनीच बांधला होता. मात्र, या घटनेला आता पाच दिवस उलटून गेले आहेत, तरीही मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, पोलिसांना घटनास्थळी किंवा प्राथमिक तपासात कोणताही थेट संशयास्पद पुरावा सापडलेला नाही. तरीही एकाच घरातील चार जणांचा असा अचानक झालेला मृत्यू ही साधी गोष्ट नसल्याने, पोलीस आता सर्वच बाजूंनी, अतिशय सूक्ष्मपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच तपासातून एक जुनी फाईल उघडकीस आली आहे.
७ वर्ष जुने प्रकरण आणि महत्त्वाची साक्ष
या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे मृत अब्दुल्ला डोकाडिया यांची पार्श्वभूमी. २०१९ साली अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला होता. जोगेश्वरीच्या एका विकासकाला (Developer) एका महिलेने मोठी रक्कम दिली होती आणि ते पैसे आणण्यासाठी विकासकाने अब्दुल्ला यांना पाठवले होते. मात्र, विकासकाने ते पैसे महिलेला परत केलेच नाहीत. या फसवणुकीच्या गुन्ह्यात अब्दुल्ला हे अत्यंत 'महत्त्वाचे साक्षीदार' (Key Witness) होते. विशेष म्हणजे, याच वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये या प्रकरणाची न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. त्यांच्या मृत्यूचा या सुनावणीशी काही थेट संबंध आहे का, याचा आता कसून शोध घेतला जात आहे.
नेमकं काय घडलं त्या रात्री?
२५ एप्रिलची ती रात्र डोकाडिया कुटुंबासाठी काळरात्र ठरली. त्यांनी काही जवळच्या नातेवाईकांना घरी जेवणासाठी बोलावले होते. रात्री १० ते साडेदहाच्या सुमारास सर्वांनी मिळून आनंदाने जेवण केले. नातेवाईक घरी परतल्यानंतर, मध्यरात्रीच्या सुमारास डोकाडिया कुटुंबाने फ्रीजमध्ये ठेवलेले कलिंगड खाल्ले आणि ते झोपी गेले. पण पहाटेच्या सुमारास अचानक चौघांनाही उलट्या, जुलाब आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. परिस्थिती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते, उपचारादरम्यान एकापाठोपाठ एक अशा चारही जणांनी प्राण सोडले. आता सर्वांचे लक्ष वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवालाकडे (Post-mortem Report) लागून आहे, त्यानंतरच मृत्यूचे खरे गूढ उकलणार आहे.
जेवणात कलिंगड आणि बिर्याणी व्यतिरिक्त काय काय होतं?
पोलिसांनी केवळ कलिंगडच नाही, तर त्या रात्री खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा सखोल तपास सुरू केला आहे. रात्रीच्या जेवणात बिर्याणीसोबत ताक, दही, चटणी, सॉस आणि काही तळलेले पदार्थही होते. यापैकी केवळ बिर्याणीच शिल्लक राहिली होती. पोलिसांनी या उरलेल्या बिर्याणीसह, बाटलीतील पाणी आणि मडक्यातील पाण्याचे नमुने (Samples) ताब्यात घेतले आहेत. हे सर्व नमुने आता जे. जे. रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (FSL) सखोल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालातून अन्नात काही विषारी घटक होते का, हे स्पष्ट होईल आणि तपासाला नवी दिशा मिळेल.






