नवी मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे गंभीर पडसाद आता नवी मुंबईतील वाशी येथील APMC (कृषी उत्पन्न बाजार समिती) घाऊक फळ बाजारात उमटताना दिसत आहेत. बाजारात कलिंगडाची आवक होऊनही ग्राहकांकडून मागणी नसल्याने विक्री जवळपास ठप्प झाली आहे.
विक्रीवर झालेला परिणाम
वाशीच्या घाऊक बाजारपेठेत आज साधारणपणे ३,३२५ क्विंटल कलिंगडाची आवक झाली आहे. मात्र, पायधुनी येथील घटनेमुळे ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फळांच्या मागणीत मोठी घट झाल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. कलिंगडाचा दर १२ ते १८ रुपये किलो इतका कमी असूनही त्याला अपेक्षित उठाव मिळत नसल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
मुंबई : उद्या, शुक्रवार १ मे रोजी 'महाराष्ट्र दिनानिमित्त' दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर राज्य शासनाच्या वतीने भव्य संचलन (परेड) आयोजित ...
व्यापाऱ्यांची मागणी
या घटनेमुळे कलिंगड व्यावसायिकांवर संक्रांत आली असून, अनेक दिवसांचा माल पडून राहिल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात बोलताना एका फळ व्यापाऱ्याने सांगितले की, पायधुनी येथील घटनेनंतर बाजारात भीतीचे वातावरण आहे. लोक कलिंगड खरेदी करायला धजत नाहीत. ही परिस्थिती पाहता शासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा. जेणेकरून ग्राहकांच्या मनातील भीती दूर होईल आणि बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल. सध्या ग्राहक कलिंगड खाणे टाळत असल्याने याचा थेट फटका शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि ग्राहकांचा विश्वास पुन्हा कसा मिळवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






