मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडं भरपूर पाऊस तर एकीकडे भरपूर ऊन पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट आणि १० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांना आहे पावसाचा यलो अलर्ट
मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. हवेतील आद्रता अधिक वाढणार असून प्रचंड उष्णता जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांना डिहायड्रेशन यांसारख्या समस्या उदभवू शकतात, त्यामुळे नागरिकांनी दुपरी उन्हात जाणे टाळावे, असे हवामान विभागाने आवाहन केले आहे. तसेच कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत दुहेरी वातावरण कायम राहणार असून काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच ३० ते ५० किमी तशी वेगाने वारे वाहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
विदर्भात अवकाळी पावसाचे संकट टळले असून अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव पुन्हा वाढणार आहे. कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर किमान तापमान २५ ते २७ अंशाच्या आसपास राहील, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याहची शक्यता आहे .
पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच तापमान ३२ ते २५ अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये उष्णतेचा पारा चढला असून हवामान कोरडे राहील, कमाल तापमान ३३ -३९ अंशाच्या दरम्यान राहिल.
मराठवाड्यातील परभणी,नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील पावसाचा यलो अलर्ट पुन्हा जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असून तापमान ३३ ते ३६ सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसेल. मात्र वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम होण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान २३ ते २५ अंशाच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.






