Friday, April 24, 2026

Nashik Crime : एकाच दिवशी तीन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, शहरात खळबळ

Nashik Crime : एकाच दिवशी तीन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, शहरात खळबळ

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांत कोयत्याने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांनी शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ या भागांत घडलेल्या या घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे तर पुढील तपास सुरू आहे.

म्हसरूळ परिसरात नवनाथ बिंदे (३०) यांच्यावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला. ईश्वर पवार, दगड्या गुंबाडे आणि यश पवार यांनी संगनमत करून बिंदे यांना अडवले. यावेळी कोयत्याने वार करत तसेच दगडाने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. तीन्ही घटनांमुळे पंचवटी परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पोलिसांनी गस्त वाढवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशीच एक घटना घडली. जत्रा हॉटेल परिसरात जुन्या वादातून रिक्षाचालक हरिभाऊ खंडाळे (४१) यांच्यावर प्रेम व आदित्य खलसे या संशयितांनी हल्ला केला. रिक्षा वळवत असताना दोघांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत कोयत्याने डोक्यावर वार (Nashik Crime) केल्याने ते गंभीर जखमी झाले.

तर फुलेनगर परिसरात तडीपार असलेल्या संशयिताने मजूर तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. भरत कुंदे (२०) याला “मी तडीपार आहे” अशी धमकी देत अमन सैय्यद याने धारदार शस्त्राने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शुभम दिक्षीत यालाही मारहाण करण्यात आली. संबंधित आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

दरम्यान या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा