मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य सुखकर होतं. पण जोडीदार निवडताना निर्णय चुकला तर आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही. लग्नाच्या आधी केलेले काही कृत्य लग्नाच्या वेळेस होणाऱ्या जोडीदारासोबत लपवून ठेवले जातात. पण हेच जर लग्नाच्या नंतर किंवा एन लग्नाच्या वेळेस समोर आले तर सर्वांनाच मोठ्या अडचणीत आणणारे ठरते. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्य (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये घडली आहे. जिथे लग्नाला अवघे 10 दिवस उरलेले असताना अचानक असा फोन आला की वरपक्षाचे धाबे दणाणले आहे.
नेमके प्रकरण काय ?
“तू तिच्याशी लग्न केलस तर संपवून टाकेन. ती माझी आहे.आमच्यात प्रेमसंबंध आहेत” असं फोनवरून थेट नवरदेवाला सांगण्यात आले. त्यांच्यात काय नातं आहे, याचे पुरावे देखील त्या फोन करणाऱ्याने पाठवले. लग्नघरी सनईचे सूर घुमत होते. लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. मिठाईवाल्यापासून ते मंडपवाल्यापर्यंत सर्वांची बुकिंग झाली होती. पण ऐनवेळी एक फोन कॉल आला आणि आनंद क्षणात दु:खात बदलून गेला.
जबलपूरच्या अजित यादवचं लग्न बरेलाच्या महक यादव बरोबर ठरलेलं. 20 एप्रिल 2026 रोजी लग्न होतं. आपल्या ऐपतीपेक्षा अजितच्या कुटुंबाने जास्त खर्च केलेला. दीड ते दोन लाख रुपये मंडप, बँड-बाजा, जेवण, बस बुकिंग यासाठी खर्च केलेले. 10 एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास अजितच्या मोबाइलवर एक फोन आला आणि डोळ्यात साठवलेली सर्व स्वप्न क्षणात मोडली.
फोन करणाऱ्याने त्याचं नाव सचिन विश्वकर्मा सांगितलं. महक माझी प्रेयसी आहे. आमचा एकमेकांवर प्रेम आहे. त्याने काही फोटो आणि वॉइस रेकॉर्डिंग पाठवली. त्यानंतर अजितच्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्यात शरीरसंबंध आहेत. एकदा गर्भपातही केलाय असा दावा सचिनने केला. अजितने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला आणि महकच्या घरच्यांना सांगितली. तेव्हा एकच गोंधळ उडाला.
पंचायत बोलवण्यात आली. महकला विचारलं, तेव्हा तिने सचिन मित्र असल्याचं सांगितलं. लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं बंद करणार नाही असं ती म्हणाली. अजितच्या कुटुंबाने यावर आक्षेप घेतला. त्यावरुन लग्न मोडलं. महकच्या कुटुंबाने लग्नाचे पैसे देण्याची तयारी दाखवली. पण नंतर माढोताला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अजित आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला, तशी तक्रार दिली. अजितचं म्हणणं आहे की त्यालाच आता खोट्या प्रकरणात फसवलं जातय. यासाठी त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ आली.






