नवी दिल्ली : उत्तर भारतातील प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बहुप्रतीक्षित दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे (दिल्ली-डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉर) (Delhi–Dehradun Expressway) आजपासून सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे खुला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे दिल्ली आणि उत्तराखंडमधील दळणवळणात मोठी क्रांती होणार आहे. उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे भेट देतील. या ठिकाणी ते एक्सप्रेसवेवरील विशेष अशा 'एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर'ची पाहणी करतील. त्यानंतर, डेहराडूनच्या वेशीवर असलेल्या ऐतिहासिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जय माँ डाट काली मंदिरात पंतप्रधान पूजा-अर्चा करतील. या धार्मिक विधीनंतर महामार्गाचे अधिकृत उद्घाटन पार पडणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते डेहराडून हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पूर्वी या प्रवासासाठी ६ तासांहून अधिक वेळ लागत असे, मात्र आता हा प्रवास केवळ २.५ (अडीच) तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळ आणि इंधन या दोन्हीची मोठी बचत होईल. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाचा राखलेला समतोल. राजाजी नॅशनल पार्कमधून जाणाऱ्या या महामार्गावर आशियातील सर्वात मोठा १२ किलोमीटरचा उन्नत (Elevated) वन्यजीव कॉरिडॉर उभारण्यात आला आहे. यामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणताही अडथळा न येता महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहील.
इराण अमेरिका यांच्यातील शांती करार निष्फळ ठरल्यानांतर इराणकडून हॉर्मूझ सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी टोल आकारण्यात आला. मात्र इराणने सोमवारी ...
या एक्सप्रेसवेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत
१. सहा तासांचा प्रवास आता अडीच तासांवर
या एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते डेहराडून या दोन शहरांमधील अंतर कमालीचे कमी झाले आहे. पूर्वी हे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना ६ तास लागायचे, मात्र आता केवळ अडीच (२.५) तासांत डेहराडून गाठता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबतच इंधनाची मोठी बचत होणार आहे.
२. ११,८६८ कोटींची भव्य गुंतवणूक
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. तब्बल ११,८६८.६ कोटी रुपये खर्चून हा महामार्ग उभारण्यात आला आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, जे आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
३. वन्यजीवांसाठी आशियातील सर्वात मोठा कॉरिडॉर
या एक्सप्रेसवेचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे पर्यावरणाचे रक्षण. राजाजी नॅशनल पार्कमधून जाणाऱ्या १२ किमी लांबीचा उन्नत (Elevated) वन्यजीव कॉरिडॉर हे या मार्गाचे मुख्य आकर्षण आहे. वन्य प्राण्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वावरता यावे यासाठी यात:
६ प्राणी अंडरपास आणि ८ ॲनिमल पास
हत्तींच्या सुरक्षिततेसाठी दोन २०० मीटर लांबीचे खास अंडरपास. डाट काली मंदिराजवळ ३७० मीटर लांबीचा बोगदा.
४. कनेक्टिव्हिटीचे जाळे
हा एक्सप्रेसवे १०० पेक्षा जास्त अंडरपास आणि ५ रेल्वे ओव्हरब्रिजने सुसज्ज आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि हरिद्वार-रुड़कीकडे जाणाऱ्या मार्गांशी जोडला गेला आहे. यामुळे उत्तर भारताची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत झाली आहे.
५. चार टप्प्यांत विकास (Phases)
या एक्सप्रेसवेचे काम चार प्रमुख टप्प्यांत विभागले गेले आहे:
- टप्पा १: अक्षरधाम (दिल्ली) ते बागपत (३२ किमी, १२ पदरी मार्ग).
- टप्पा २: बागपत ते सहारनपूर बायपास (११८ किमी, ६ पदरी मार्ग).
- टप्पा ३: सहारनपूर ते गणेशपूर (४० किमी, ६ पदरी मार्ग).
- टप्पा ४: गणेशपूर ते डेहराडून (२० किमी, बोगदे आणि वन्यजीव कॉरिडॉरसह).
६. 'स्मार्ट' ट्रॅफिक यंत्रणा आणि सुरक्षा
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या संपूर्ण कॉरिडॉरवर 'ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' (ATMS) बसवण्यात आली आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे वाहतुकीचे अचूक व्यवस्थापन होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.





