उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश
मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करत आहे.. विशेषतः लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठोस पावले उचलली आहेत.
बाटु विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक आणि गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी,संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या आहेत. तसेच या सर्व कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे अनेक महाविद्यालये व संस्थाचालकांनी विद्यापीठापासून विसंलग्निकरणाचीही मागणी केली आहे. या सर्व शैक्षणिक बाबींची विचार करून प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश देऊन परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
नव्या नेतृत्वावर मोठी जबाबदारी
परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंची नियुक्ती विद्यापीठात करण्यात आली आहे. राजेश अग्रवाल समितीसह विविध शासकीय समित्यांवर काम केलेले आहे.या अनुभवातून प्रभारी कुलगुरूंनी
पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे आणि विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत.
विद्यापीठाच्य प्रशासकीय सुधारणा करण्याचे शासनाचे 'व्हिजन'
निकाल प्रक्रिया कालबद्ध करण्यासाठीपरीक्षा वेळेत घेऊन निकाल विहित मुदतीत जाहीर करण्याला सर्वोच्च प्राधान्य
एआय (AI) सक्षम महाविद्यालये : विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
सेंटर्स ऑफ एक्सलन्स (Centers of Excellence): सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील. यासाठी CSR निधी आणि शासकीय अनुदानातून तरतूद केली जाणार आहे.तसेच प्रभारी कुलगुरूंना परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी स्पष्ट आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे हित राज्य शासनाचे सर्वोपरी असून, शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षा व निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्निकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.