मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर गेले आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी ३ एप्रिलला होणार होता, मात्र आता तो सोमवारी ६ एप्रिलला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव हा टप्पा आणि मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा टप्पा मागील तीन ते चार महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
या दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून संचालनासाठी आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्रही मिळाले आहे. तरीही लोकार्पण रखडल्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही मुंबईकरांना मेट्रो सेवेचा लाभ घेता येत नव्हता. या दोन मेट्रो टप्प्यांच्या लोकार्पणासोबतच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन आणि ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाच्या कामालाही सुरुवात होणार होती. त्यासाठी राज्य सरकारने ३ एप्रिलची तारीख निश्चित केली होती आणि त्यानुसार एमएमआरडीएने (एमएमआरडीए) तयारीही सुरू केली होती. मात्र, सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी उशीरा रात्री राज्य सरकारने शुक्रवारचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे सर्व कार्यक्रम सोमवार (६ एप्रिल) रोजी होणार असून त्यानंतर मंगळवार (७ एप्रिल) पासून या दोन मेट्रो मार्गिकांवर नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना मेट्रोसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, कार्यक्रम पुढे ढकलण्यामागचे अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारामुळे काही नेते व्यस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.