मुंबई: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील सुमारे ४५०० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील जुना सर्व्हे नंबर ३६९ मधील घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत ही लक्षवेधी मांडली होती.
१ जानेवारी २०११ पूर्वीची घरे नियमित होणार
मंत्री बावनकुळे म्हणाले की, १ जानेवारी २०११ पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे. या अंतर्गत पुलगावमधील रहिवाशांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड, खासगी सनद आणि अधिकृत नोंद अभिलेखात करून दिली जाईल. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भागात यासाठी विशेष समित्या नेमून जुन्या चुकीच्या नोंदी रद्द केल्या जातील आणि सर्वसामान्यांना त्यांच्या घराचा अधिकृत मालकी हक्क मिळवून दिला जाईल.