सुशील परब
यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ भिडतील. हा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा २२ वर्षीय युवा फलंदाज जेकब बेथेलने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध २०२६ च्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत अविस्मरणीय शतक झळकावले. २५४ धावांचा पाठलाग करताना, बेथेलने फक्त ४८ चेंडूंत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०५ धावांची धमाकेदार खेळी करत टी-२० विश्वचषक बाद फेरीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला. भारतीय फलंदाजीचा विचार करता संजू सॅमसन आणि इशान किशन हे भारतीय फलंदाजीचा कणा बनले आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी सातत्याने छोट्या पण महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाजीचे तीन पर्याय असतील, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल फिरकीची धुरा सांभाळताना दिसू शकतात. विशेषतः वरुण चक्रवर्ती सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे, ज्याने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ४ ओव्हरमध्ये ६४ धावा लुटवल्या. गेल्या चारही सामन्यांत त्याने विकेट तर घेतल्या आहेत, पण प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याला प्रचंड चोपलेही आहे. वरुण चक्रवर्ती सध्या या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट (१३) घेणारा गोलंदाज आहे, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. दुसरीकडे, व्यवस्थापनाने अभिषेक शर्मावरही सतत विश्वास दाखवला आहे आणि फायनलमध्येही त्याला नक्कीच संधी मिळेल. न्यूझीलंडकडेही मजबूत फलंदाजी आहे. टीम सीफर्ट, फीन अॅलन, ज्याने टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसमोर जलद शतकाचा विक्रम केला आहे. त्याला लवकर बाद करणे फायद्याचे होणार आहे. त्यानंतर रचिन रवींद्र, ग्लेन फिलीप्स, मार्क चॅपमन, डॅरी मिचेल, मिचेल सँटनर असे फलंदाज आहेत. गोलंदाजीत मॅट हेन्री, कोल मॅकनचे, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर कामचलावू गोलंदाज रचिन रवींद्र, जेम्स निशाम असे गोलंदाज आहेत. आता फायनल जिंकून वर्ल्डकप पुन्हा एकदा भारताकडे येण्यामध्ये केवळ दोनच अडथळे आहेत. एक आहे न्यूझीलंड संघ आणि दुसरा म्हणजे पनोती नरेंद्र मोदी स्टेडियम! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड संघाने भारताला ३ वेळा हरवले आहे. भारत त्यांच्यासमोर अजून जिंकलेला नाही. भारत सध्याचा ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ असून, सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून जागतिक विक्रम करण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ १० वेळा आमने-सामने आले आहेत, ज्यापैकी कीवी संघाला केवळ २ वेळाच विजय मिळवता आला आहे. यावरून स्पष्ट होते की, एकूण रेकॉर्डमध्ये भारताचे पारडे जड आहे. आता पाहूया टी-२० विश्वचषक २०२६ कोण विजेता होणार?







