मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात 'गेटवे एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थे'च्या प्रलंबित विषयांबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.
बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, 'प्रवाशांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.' सध्या वापरात असलेल्या जुन्या बोटींच्या जागी अत्याधुनिक आणि सुरक्षित 'अपग्रेडेड' बोटी आणण्याच्या सूचना त्यांनी संस्थेला दिल्या.
संस्थेच्या सध्या ९० बोटी कार्यरत आहेत. या बोटींचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करून नवीन आणि 'ॲडव्हान्स' बोटी खरेदी करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले.
नवीन बोटी खरेदी करण्यासाठी संस्थेला आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी संस्थेच्या सदस्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले. जलवाहतूक क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना जागतिक दर्जाची सेवा मिळावी, यासाठी तांत्रिक बाबींवर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रवाशांना चांगली सेवा आणि सुरक्षा देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.