Thursday, March 26, 2026

जिल्हा परिषदेत उबाठा हाती भोपळा, आजवरचा सर्वात मानहानीकारक पराभव

जिल्हा परिषदेत उबाठा हाती भोपळा, आजवरचा सर्वात मानहानीकारक पराभव

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने निर्णायक विजय मिळवला असला, तरी उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला असून, ग्रामीण भागातील जनतेने उबाठा गटाला स्पष्ट नाकारले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. तर, पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. शिवसेनेला दोन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही दोन जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेसने एका ठिकाणी सत्ता मिळवली. मात्र उद्धव उबाठा गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही.

या पराभवामागे उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उबाठाच्या एकाही बड्या नेत्याने या निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही किंवा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >