Thursday, May 7, 2026

Navnath Ban : कुंभमेळ्याचा हिंदू धर्मध्वज फडकल्यामुळे संजय राऊतांचे पोट दुखू लागले...

Navnath Ban : कुंभमेळ्याचा हिंदू धर्मध्वज फडकल्यामुळे संजय राऊतांचे पोट दुखू लागले...

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये इंडिया आघाडीचा पराभव झाल्यांनतर अनेक वर्षे मुंबईत बसून राहिलेले संजय राऊत झोपेतून उठत कार्यकर्त्यांशी संवाद साधायला नाशिकला गेले. संजय राऊत, पक्षबांधणीचा कितीही प्रयत्न केलात तरी हिंदुत्वाशी साथ देत नाही तोपर्यंत तुम्हाला जनता तुमच्या पाठीशी उभी राहणार नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये हिंदू धर्मध्वज फडकला तर संजय राऊतांच्या पोटात दुखते. हा धर्मध्वज हिंदू धर्माचा, सनातनाचा आणि आपली संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक हिंदू नागरिकाचा आहे. या धर्मध्वजाचे महत्व तुम्हाला कळणार नाही. तिथे हिरवा झेंडा फडकला असता तर मात्र तुम्हाला आनंदाचे भरते आले असते, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशजाला धर्मध्वज प्रतिष्ठापनेला बोलावले नाही, असे संजय राऊत म्हणत आहेत. भाजपा धर्माची ठेकेदार नाही तर सेवेदार असल्याचे सांगत श्री. बन म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे यांना सन्मानाने निमंत्रण दिले होते. परंतु उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाहीत. आजपर्यंत तुम्हाला अयोध्येला जावेसे वाटले नाही. कारण अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले तर दाढ्यांची मते आपल्याला मिळणार नाहीत, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत आहे. ज्यांना रामलल्लाच्या दर्शनाला जावेसे वाटले नाही ते धर्मध्वजाच्या कार्यक्रमाला आले असते का, असा सवाल श्री. बन यांनी केला.

नाशिकमध्ये मोठमोठे आकडे फेकायचे आणि घोटाळा झाला असे सांगायचे हा संजय राऊतांचा जुना धंदा आहे. नाशिकचे संपर्कप्रमुख असल्यामुळे संजय राऊतांनी काही गुंतवणूक नाशिकमध्येही केली आहे आणि तिथल्या म्हाडा घोटाळ्यात त्यांच्या साथीदारांचेही हात आहेत. सरकार याची चौकशी करेल आणि संजय राऊत यांची जी काही बेनामी गुंतवणूक नाशिकमध्ये झालेली आहे त्याचीही चौकशी होईल, असे श्री. बन म्हणाले.

नाशिकमध्ये रिंग रोडसाठी भूसंपादन सुरू आहे. सरकारकडून कुठेही, कुणासोबतही जबरदस्ती केली जात नाही. शेतीचा योग्य मोबदला देण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. परंतु चांगला प्रकल्प सुरू झाला की काही लोकांना सुपारी देऊन पुढे करायचे आणि तो प्रकल्प थांबवायचा. त्या प्रकल्पाला उशीर कसा होईल हे पाहायचे हा उबाठा गटाचा धंदा आहे. जेव्हा समृद्धी महामार्ग सुरू होणार होता तेव्हाही अशाच काही सुपारीबाजांना हाताशी धरून नाशिकमध्ये विरोध करण्याचे पापही उद्धव ठाकरेंनी केले होते. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सरकार रिंग रोड बनवत आहे. अशा सरकारी प्रकल्पाला विरोध करण्याचे काम उबाठा गटाकडून केले जाते. परंतु महाराष्ट्रातील जनता आणि नाशिकमधील जनता सुज्ञ आहे. अशा सुपारीबाज लोकांना ते थारा देणार नाहीत, असे श्री. बन यांनी सुनावले.

Comments
Add Comment