Saturday, May 16, 2026

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च २०२६ पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग पूर्ण होणार आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

२०२१ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) हे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित करण्यात आले. रस्त्याच्या कामासाठी मँग्रोव्ह, फॉरेस्ट विभाग तसेच रेल्वेच्या आवश्यक परवानग्या मिळवण्यास कालावधी लागल्याने प्रारंभी विलंब झाला. सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम २०२२ पासून सुरू झाले आहे.

तीन पूल जानेवारी २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार

या २३.८ कि.मी.लांबीच्या मार्गावर चार पूल असून त्यापैकी तीन पूल जानेवारी २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहेत. रेल्वेखालील क्रॉसिंगसाठी अंतिम नकाशा मान्यतेसाठी सेंट्रल रेल्वेकडे पाठवला असून मंजुरी मिळताच हा पूलही पूर्ण होईल. रस्त्यावर दररोज २ ते २.५ लाख वाहने धावत असल्याने कामाचा वेग कमी झाला असल्याने हा रस्ता मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा निर्धार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच बीएमसी-एनएचएआय यांच्यातील करारानुसार अतिरिक्त जागा हस्तांतरित झाल्यावर सुलभ वाहतूक मार्ग निश्चित केला जाणार आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रूट) प्रकल्पालाही वेग आला असून २०२८ पर्यंत हा 'ग्रीन आणि ॲक्सेस कंट्रोल' मार्ग कार्यान्वित होणार आहे. ऑरेंज गेट-ठाणे असा हा उन्नत मार्ग नागपूर समृद्धी महामार्गासारखा जलद आणि अखंड प्रवासाचा अनुभव देणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा