पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वास
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे मीरा रोड येथील शिवार गार्डन मैदानात पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना “आम्हाला खुर्चीचा लोभ नाही, शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असे स्पष्ट केले. ''येत्या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल'', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिंदे म्हणाले की, मागील १०–१२ वर्षांत मीरा-भाईंदरमध्ये अभूतपूर्व बदल झाले असून विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी एकजूट आवश्यक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहराच्या विकासासाठी प्रभावी काम केले असून, विकासाबरोबरच शिवसेनेची संघटनात्मक ताकदही वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो निष्ठेने काम करतो तोच राजकारणात पुढे जातो,” असे सांगत प्रताप सरनाईक हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहून महापालिकेवर भगवा फडकवावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मीरा-भाईंदरमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल, असा संकेत देत याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. या निर्धार मेळाव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, निशा नार्वेकर, रिया म्हात्रे, पूजा आमगावकर, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.