Friday, May 15, 2026

मुंबई, ठाण्यात १०० टक्के महायुती, अन्य ठिकाणी एकत्र लढण्याबाबत समन्वय समिती

मुंबई, ठाण्यात १०० टक्के महायुती, अन्य ठिकाणी एकत्र लढण्याबाबत समन्वय समिती

नागपूर : मुंबई आणि ठाणे महापालिकेत येत्या निवडणुकीत महायुती १०० टक्के एकत्र लढणार असून, राज्यातील उर्वरित महापालिकांमध्ये जागावाटप व आघाडीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रत्येक महापालिकास्तरावर ४-५ प्रमुख नेत्यांची समन्वय समिती नेमली जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी नागपूर येथे केली.

गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चव्हाण म्हणाले, “मुंबई-ठाण्यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये १०० टक्के महायुती होईल. इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर ४-५ नेत्यांची समन्वय समिती तयार केली जाईल. ही समिती महायुती आणि जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा करेल, तर अंतिम निर्णय वरिष्ठ स्तरावर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे मिळून घेतील.”

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार जनहिताला प्राधान्य देते. राजकारणात वैर कायमस्वरूपी नसते, मित्रत्वही कधीही होऊ शकते. त्यामुळे जनतेच्या हितापलीकडे अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. महायुतीत शिंदेसेना, राष्ट्रवादी, आरपीआयसह सर्व घटक पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक महापालिकेत सर्व पक्षांच्या नेत्यांची समिती तयार करून स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया राबवली जाईल.”

राज्यात एकूण २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. “स्थानिक परिस्थिती रोज बदलते. पूर्वीची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे समन्वय समिती प्राथमिक चर्चा करेल आणि अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील,” असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. महायुती एकत्र लढल्यास जनतेला सकारात्मक संदेश जाईल आणि विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा