Saturday, December 13, 2025

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्तानला धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक

इस्लामाबाद : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ माजली आहे. केंद्रातील तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत असून स्फोटामागील सूत्रधार कोण हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र या घटनेनंतर पाकिस्तानमध्येही हालचाल सुरू झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सोमवारी रात्री तातडीची बैठक बोलावून सैन्याला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीतील घटनेनंतर पुन्हा एकदा भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी कारवाई होण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तानने देशातील सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे. सर्व विमानतळांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सीमावर्ती भागातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानी उच्च अधिकारी या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

पाकिस्तानच्या वायुदलाने एअर डिफेन्स प्रणाली सक्रिय केली असून, महत्वाच्या ठिकाणांहून तातडीने विमान उड्डाणासाठी तयारी ठेवली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबरसाठी एअर मॅन नोटीस (NOTAM) जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तान सैन्याला सदैव तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारताच्या स्फोटाशी संबंधित तपासाचा अँगल पाकिस्तानकडे वळण्याची भीती पाकिस्तानला सतावत आहे. कारण भारतात घडणाऱ्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले जातात. दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याच्या शक्यतेवर तपास सुरू आहे. याआधी पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली होती. त्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाचा समावेश होता. त्या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. भारताने त्या वेळीच पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला होता की, भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल.

Comments
Add Comment