पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पवईत शूटिंगच्या नावाखाली निष्पाप मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्टुडिओमध्ये डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे. एकूण १७ मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सामान्य नागरिक यांची सुटका करण्यात आली आहे.


स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी गेलेली मुले दुपारपर्यंत घरी न परतल्याने पालक चिंता व्यक्त करत स्टुडिओबाहेर जमा झाले. त्यांनी काही मुलांना स्टुडिओच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहून मदतीसाठी हावभाव करताना बगितले. यामुळे परिसरात गोंधळ उडाला. यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पवई पोलीस आणि साकीनाका पोलीस घटनास्थळी स्पेशल युनिट्स आणि क्विक अ‍ॅक्शन फोर्ससह पोहोचले. दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर आरोपीने स्वतःकडे बंदूक आणि ज्वलनशील पदार्थ असल्याचे सांगून आत प्रवेश करणार्‍यांना धमकी दिली. त्याने “कोणीही येण्याचा प्रयत्न केला तर मी स्टुडिओ पेटवून देईन” असे धमकावून सांगितले.


पोलिसांनी रोहितशी संवाद साधून त्याला समजावण्याचा प्रयत्न झाला. तो दरवाजा उघडत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला. आत असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी १७ मुलं, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक स्थानिक नागरिक अशा १९ जणांची सुरक्षित सुटका केली.


रोहितकडे एक बंदूक आणि काही संशयास्पद वस्तू आढळल्या असून, पोलिस तपास करत आहेत की ती खरी बंदूक होती का ? त्याच्या मागण्या आणि पार्श्वभूमीचीही चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी या मुलांना बोलावण्यात आलं होतं, आणि त्याचवेळी त्यांना बंदी बनवलं गेलं.


आरोपीने हे कृत्य का केले?


आरोपीने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, “मला या मुलांना काहीच करायचं नाही. मात्र मला काही लोकांशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. मला कोणी रोखण्याचा, इथे येण्याचा प्रयत्न केला तर या मुलांबरोबर काही वाईट घडलं तर त्यास मी जबाबदार नसेन.”


आरोपी रोहित मूळचा पुण्यातील रहिवासी असून, पूर्वी त्याला शिक्षण खात्याशी संबंधित एका शाळेच्या दुरुस्तीचं कंत्राट मिळालं होतं.


रोहितचा आरोप आहे की, त्या शाळेचं काम पूर्ण केल्यानंतरही सरकारकडून त्याचे देयकाचे पैसे मिळाले नाहीत. या थकबाकीच्या मुद्द्यावर त्याने अनेकदा सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


असे सांगितले जात आहे की, या सगळ्या आर्थिक तणावामुळे आणि दुर्लक्षामुळे रोहित आर्य मानसिकरीत्या अस्वस्थ झाला होता. तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता, पण त्याऐवजी आपलं म्हणणं लोकांसमोर पोहोचावं म्हणून त्याने लक्ष वेधण्यासाठी मुलांना ओलीस ठेवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पोलिस आरोपीच्या या दाव्यांची सत्यता पडताळून पाहत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Decisions : फडणवीस सरकारने घेतले महाराष्ट्राच्या हिताचे सहा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक महाराष्ट्राच्या हिताचे

50 Kg Sack : बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांची चढ -उतारा साठी ५० किलोची मर्यादा

मुंबई : जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता

SIT : विरोधकांनी 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर एसआयटीकडे द्या !!

मुंबई : विरोधक केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी केवळ 'तोंडाच्या वाफा' टाकू नयेत, पुरावे असतील तर

Ready reckoner : जनतेच्या हितासाठी रेडी रेकनर दरवाढ फेटाळली

मुंबई : सध्याची जागतिक स्थिती व युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हितासाठी मालमत्तेच्या दरात १२ ते १४

Agriculture Minister Dattatray Bharne : खरीप हंगाम २०२६ युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवावा : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी मुंबई : खरीप हंगाम २०२६ करिता

सरकारने वाढवली ई- केवायसीची मुदत; लाडक्या बहिणींचा हफ्ता आता थांबणार नाही

मुंबई : राज्यातील लाखो महिला या महायुती सरकारच्या लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत आहेत. ते पैसे योग्य ठिकाणी