मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचेकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
मुंबई महानगरात ठिकठिकाणी असणारे कबुतरखाने न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशान्वये हरकती तथा सूचना मागविण्याची कार्यवाहीही महानगरपालिका प्रशासनाने केली.
या सर्व पार्श्वभूमीवर श्री मुंबई जैन संघ संगठनचे नितीन व्होरा, मुकेश जैन, अतुल शहा, विजय जैन, अध्यात्म परिवाराचे हितेश मोटा आदींच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची मंगळवारी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली. मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा जागांचा शोध घ्यावा की जिथे कबुतरांना दाणे पुरवता येतील आणि नागरिकांनाही कबुतरखान्यांचा त्रास होणार नाही, अशी प्रमुख मागणी या शिष्टमंडळाने केली.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, या कबुतरखान्यांची बाब न्यायप्रविष्ट असल्याने अशा पर्यायी जागांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे गगराणी यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय धुवाळी October 30, 2025 02:03 AM
यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी टॉवर उभे आहेत त्या टॉवरच्या टेरेस वर कबुतर खाना उपलब्ध होऊ शकतो.आणि जैन समजला बाहेर जाण्याचा त्रास हीं होणार नाही