मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या विरोधात सुरू असलेल्या राजकीय कटकारस्थानांवर जोरदार प्रहार केला आहे. एका धारदार ट्वीटद्वारे त्यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला की, "छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही."
सततच्या षड्यंत्रावर थेट भाष्य
कदम यांनी उघडपणे सांगितले की, २०१९ पासून काही शक्तींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कायमस्वरूपी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निष्ठावान शिवसैनिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ते केवळ या संकटातून बाहेर पडले नाहीत, तर पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांची राजकीय ताकद सिद्ध झाली.
कुटुंबाला लक्ष्य केल्याबद्दल तीव्र नाराजी
२०२४ च्या निवडणुकीतील गलिच्छ राजकारणावर टीका करताना कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या कुटुंबियांचा वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर केला गेला. विशेष म्हणजे, राजकारणापासून दूर असलेल्या त्यांच्या आईलाही जाणूनबुजून या वादात ओढण्यात आले, जो नीचपणाचा कळस होता, असे त्यांनी म्हटले.
भविष्यातील भूमिकेवर ठाम विश्वास
या सर्व नकारात्मक राजकारणाचा कोणताही परिणाम आपल्यावर होणार नाही, असा ठाम आत्मविश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे. "राजकारणात सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतंच. परंतु, या घाणेरड्या राजकारणामुळे मी कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
आपला निश्चय व्यक्त करताना त्यांनी शेवटी सांगितले की, "मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे आणि निर्धाराने निभावत राहणार आहे." योगेश कदम यांनी ट्वीटच्या शेवटी आत्मविश्वासाने म्हटलं की,“ छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.






