कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर


कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची मिठ्ठास मुरलेल्या मातीतून जेव्हा एखादी कलाकृती जन्माला येते, तेव्हा तिच्यात अधिक उणे काही होण्याची शक्यता फारच कमी असते. अगदी त्याबरहुकूम, आता ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या मराठी सिनेमाने कोकणाला आर्त साद घालत रूपेरी पडद्यावर साखरपेरणी केली आहे.


सुनील तावडे, प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले, साईंकित कामत, स्वानंदी टिकेकर यांच्यासारखे कलावंत एखाद्या सिनेमात एकत्र आले आहेत म्हटल्यावर, त्या कलाकृतीच्या माध्यमातून उत्तम तेच अनुभवायला मिळणार याबाबत शंका उरत नाही. या आणि त्यांच्यासह सिनेमात असलेल्या इतर कलावंतांनी मिळून ‘कुर्ला टू वेंगुर्ला’चा हा प्रवास देखणा केला आहे. या सिनेमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा...! कोकणातल्या इरसालकीची मूर्तिमंत उदाहरणे ठरावीत, अशी यातली पात्रे आणि त्यांचे अचूक प्रकटीकरण यामुळे हा सिनेमा उठावदार झाला आहे. त्यादृष्टीने सिनेमाची कथा, पटकथा व संवादलेखन करणारे अमरजित आमले; दिग्दर्शक विजय कलमकर आणि त्यांच्या एकूणच टीमचे परिश्रम फळाला आल्याचे स्पष्ट होते.


शहरातला एकूणच कोलाहल आणि ग्रामीण जगरहाटीतली शांतता, अशा दोलायमान स्थितीवर हा सिनेमा हिंदोळे घेत जातो. या दोन्ही संस्कृतींचा मिलाफ साधत आणि त्यायोगे, प्रकर्षाने कोकणातल्या माणसांच्या अंतरंगात उतरून त्यांच्या जीवनमानाची मुशाफिरी घडवत हा सिनेमा बरेच काही बोलत राहतो. लग्न आणि त्यानुसार निर्माण होणाऱ्या प्रश्नांना गवसणी घालण्याचे कार्य हा सिनेमा करत असला, तरी त्या आडून एकूणच मानवी जीवनाचे सार उलगडून सांगण्याचे कर्तव्यही तो बजावतो. समुद्रकिनाऱ्याच्या साक्षीने शहर आणि गाव यातली सीमारेषाही तो ठळकपणे स्पष्ट करतो. ग्रामीण भागातल्या तरुणाईच्या मानसिकतेचा घेण्यात आलेला वेध, हेही या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे.


हे सर्व करताना, हा सिनेमा पार कोकणाची भ्रमंती घडवून आणतो. अगदी दशावतारापासून होळीपर्यंतचे कोकणाचे उत्सवी प्रतिबिंब या सिनेमात पडले आहे. इतकेच नव्हे; तर हा सिनेमा पडद्यावर प्रसन्नतेचे चांदणे पसरवत जातो आणि याचे कारण म्हणजे सिनेमाचे छायाचित्रण...! कोकणातली निसर्गस्थळे विहंगमतेने टिपण्याचे काम रंगनाथ बाबू गोगीनेनी यांच्या कॅमेऱ्याने यात करून ठेवले आहे. कॅमेरावर्कचा उत्कृष्ट नमुना सादर करत असतानाच निळेशार आभाळ, हिरवीगार वनसंपदा आणि लाल माती यांचा उत्तम त्रियोग यात साधला गेला आहे. एकूणच, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या सिनेमाने माणसाचे एकंदर जगणे, नातेसंबंध यावर थेट भाष्य करत कोकणाच्या पार्श्वभूमीवर यातला आशय अधिकच बोलका केला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राची सुपरस्टार या कार्यक्रमासाठी निवड...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल धनश्री काडगावकरने विविध भूमिका साकारून स्वतःची अशी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख

प्रेम करावं नाटकावर... शंभरीच्या उंबरठ्यावर...!

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर एखाद्या नाटकाचे शंभर प्रयोग होणे, ही नाट्यसृष्टीच्या दृष्टीने नवीन गोष्ट नाही.

पारदर्शक दुधारी तलवारीचा वापर

पाचवा वेद : भालचंद्र कुबल गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या शासन पुरस्कृत राज्य नाट्य स्पर्धा आणि त्यासाठी

रेणुका शहाणेची 'धावपट्टी' ऑस्करला

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तयार केलेला 'धावपट्टी' हा अॅनिमेटेड लघुपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून ही

तपोवनमधील वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध

नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. मात्र याच कुंभमेळ्यात साधुग्राम बांधण्यासाठी इथल्या तपोवन परिसरातील अनेक

विनय धुमाळ यांच्याकडून अभिनयासोबतच तंत्रज्ञानाविषयी बऱ्याच गोष्टी शिकलो

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या