जयपूर: राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. खाटूश्यामजी मंदिरातून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात ७ मुले आणि ३ महिलांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत.
मनोहरपूर राष्ट्रीय महामार्गावर सैंथल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापी गावाजवळ हा अपघात घडला. भाविक एका पिकअप गाडीतून प्रवास करत होते. याच वेळी त्यांची गाडी एका कंटेनरला धडकली. या धडकेत पिकअप गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळताच सैंथल पोलिसांचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे सर्व भाविक उत्तर प्रदेशातील एटाह येथील रहिवासी होते आणि ते खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.