'ब्राह्मण पाताळयंत्री', जाधव यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटणार?

भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा


मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर टीका करताना जाधव यांची जीभ धसरली. जाधव यांनी "ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री" असे म्हटले आहे. या वक्तव्यानंतर ब्राह्मण समाज आक्रमक झाला असून, जाधव यांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, भास्कर जाधव यांनी माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल, पण मी माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.



जाधव यांची माफी मागण्यास ठाम नकार


मुंबईत झालेल्या एका मेळाव्यात भास्कर जाधव यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर हल्लाबोल केला. त्यांनी संघाचे गुहागर तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना 'बेडकाची उपमा' दिली. यानंतर "ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात" अशी टिप्पणीही त्यांनी केली. यामुळेच ब्राह्मण समाज संतापला आहे. यावर जाधव म्हणाले की, "मी गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघाबाबत बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, माझी राजकीय कारकीर्द संपली तरीही चालेल."



'राजकीय षडयंत्राचा भाग'


जाधव यांनी आरोप केला की, त्यांना निवडणुकीत हरवण्यासाठी विविध समाजांना त्यांच्या विरोधात भडकवण्यात आले होते. तसेच, 'वंचित आघाडी'च्या अण्णा जाधव यांच्यावरील हल्ल्यात त्यांचे नाव जाणूनबुजून गोवण्यात आले. त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघावर निशाणा साधत म्हटले की, "घनशाम जोशी यांनी पक्ष म्हणून पत्र लिहिले असते तर ठीक होते, पण समाज म्हणून पत्र लिहिल्याचे वाईट वाटले. माझ्या विरोधात जिल्ह्यात किंवा राज्यात कुठेही पत्र द्या, मी ते गटारात फेकून देतो."



कुणबी समाजाला सावध राहण्याचा इशारा


भास्कर जाधव यांनी यावेळी गुहागरमधील कुणबी समाजालाही सावध राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, "मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकले जाईल. तुमच्या घरात पूजा सांगायला कोणी आले नाही तर घाबरू नका, मी स्वतः पूजा सांगायला येईन." त्यांनी कुणबी समाजाचे नेते रामभाऊ बेंडल यांच्या एकाच वेळी निवडून येण्याचा संदर्भ देत, समाजात फूट पाडून नेतृत्वाला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला.


जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "गेल्या निवडणुकीत माझ्यावर जातीवाचक वक्तव्य केल्याचा आरोप करून ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पेट्रोल बॉम्बने माझ्या घरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला." त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दबाव असतानाही, रत्नागिरीचे एसपी धनंजय कुलकर्णी यांनी पुरावा न मिळाल्याने मला अटक केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'आतापर्यंत मी शांत होतो, पण आता कोणाला सोडणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान, मंगळवारी जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. “मी कुठेही समाजाबद्दल अवाक्षर बोललेलो नाही. माझ्या भाषणाचा रोख गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघावर होता, संपूर्ण समाजावर नव्हता. तरीही त्यांनी समाजाच्या वतीने निषेधाचे पत्र दिले. मग मी माफी कसली मागायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत