यादरम्यान निलेश राणे यांनी काही आरोप आणि गंभीर टीका केल्या आहेत. “महावितरणमध्ये ९० टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. मात्र त्यांना कामाचं प्रशिक्षणही दिलं जात नाही, आतापर्यंत ११ कंत्राटी कामगार गेले, मात्र कोणालाच मदत मिळाली नाही,"असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी “१५ वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्याच्या कामात रस्ते खोदले जात आहेत, पण काम पूर्ण होत नाही,” अशी खंतही व्यक्त केली. आम्हाला किरकोळ मदत नको, भरीव निर्णय घ्या, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.
नीलेश राणे यांच्या मुद्द्यावर या नेत्यांचा दुजोरा
या मुद्द्याला पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, “सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे.” रोहित पवार यांनीही “ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. याविषयी उत्तर देताना मंत्री मेघना बौर्डिकर यांनी कुडाळ मालवण विषय प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढणार असल्याचं सांगितलं.