मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' या घोषणेमुळे तापले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या जुन्या उदाहरणाचा दाखला देत शिंदे यांची पाठराखण केली आहे.
मुंबईत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' म्हटले म्हणजे त्यांचे गुजरातवर प्रेम असून महाराष्ट्रावर प्रेम नाही असे समजणे चुकीचे आहे. त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण देत सांगितले की पवार साहेबांनी देखील एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये अशीच घोषणा दिली होती. त्यामुळे इतका संकुचित विचार कुणी करत असेल तर ते चुकीचे आहे आणि आता विरोधकांकडे मुद्दे नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले.
मराठी-हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय झाला जाहीर मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या ...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून वाद सुरू होता. ठाकरे बंधूंनी मोर्चाचे आयोजन केल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केला. यावेळी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' असे म्हटले होते.
एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवण करून दिली की यापूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार साहेब 'जय महाराष्ट्र, जय कर्नाटक' म्हणाले होते. फडणवीस यांनी प्रश्न विचारला की याचा अर्थ पवार साहेबांचे कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे असे समजायचे का?
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर 'जय गुजरात' म्हटले याचा अर्थ एकनाथ शिंदेंचे गुजरातवर जास्त प्रेम आहे आणि मराठीवर कमी झाले असे नाही. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही असे त्यांनी नमूद केले.
मराठी माणूस वैश्विक आहे असे सांगत फडणवीस यांनी याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे आणि भारताला स्वतंत्र केले आहे याचा उल्लेख केला. मुघल सत्ता घालवण्याचे आणि दिल्लीवर भगवा झेंडा रोवण्याचे काम मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.