मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. त्यांच्या या धैर्यामुळे आज प्रशासन, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहेत. स्त्री समाज घडविते. पण योग्य संधी मिळाली तर ती इतिहासही घडविते. मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचेही मोठे योगदान आहे. घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलेसह घर सांभाळणाऱ्या गृहिणीचाही गौरव झाला पाहिजे, अशा शब्दात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा गौरव केला.


मुंबई महानगरपालिकेच्या कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या वतीने आयोजित 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार २०२६’ वितरणप्रसंगी महापौर रितू तावडे बोलत होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात बुधवारी १८ मार्च २०२६ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला.


अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, प्रधान आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, स्नेहा इंडियाच्या संस्थापक व पद्मश्री सन्मानित डॉ. अर्मिडा फर्नांडिस, उप आयुक्त (परिमंडळ १) तथा सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या अध्यक्ष चंदा जाधव आदींसह पुरस्कार्थी अधिकारी-महिला उपस्थित होत्या.


महापौर रितू तावडे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. महानगरपालिकेने सावित्रीबाई फुले स्री संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. याद्वारे कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक आजारावर मात करण्यासाठी समुपदेशन, वैद्यकीय सहाय्यासाठी मदत दिली जाते. अत्याचार झालेल्या पीडित महिलेला योग्य न्याय मिळावा यासाठी महानगरपालिकेने विशेष वैद्यकीय कार्यप्रणाली तयार केली आहे, असेही महापौर रितू तावडे म्हणाल्या.


प्रमुख पाहुण्या पद्मश्री डॉ. अर्मिडा फर्नांडीस म्हणाल्या की, महिलांमध्ये जग बदलण्याची शक्ती आहे. महिला ही सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांचे रुप असते. समाजातील महिला सशक्त, शिक्षित आणि सुरक्षित व्हायला हव्यात. तेव्हाच समाजाला नारीशक्तीचे महत्त्व कळेल, असे त्यांनी नमूद केले.



स्त्रियांनी आपल्या कामातून उत्तरे द्यायला हवी


 

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, क्षेत्र कोणतेही असो महिला कर्तृत्व सिद्ध करतात. आपण मागे नाही, असे प्रत्येक महिलेने स्वत:ला सांगितले पाहिजे. राज्य शासनात सन १९७० पासून उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यांची निवड झाली. तर महानगरपालिकेत सन २०१० मध्ये सर्वप्रथम सहायक आयुक्त या पदावर महिला अधिकारी रुजू झाली. स्त्रियांनी कामाच्या ठिकाणी सवलती न मागता आपल्या कामातून उत्तरे दिली पाहिजे, असे डॉ. जोशी यांनी नमूद केले.



महिलेने कायम ज्ञान मिळवले पाहिजे


 

प्रधान आयकर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे म्हणाल्या, आज भारतीय महिलांनी खूप प्रगती केली आहे. शिक्षण हे महत्त्वाचे असून, महिलेने कायम ज्ञान मिळवले पाहिजे. आज प्रत्येक स्त्रीने गरजुंना मदत करण्याचा निर्धार केला पाहिजे. त्यातून महिलांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढेल, असे त्या म्हणाल्या.


या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत महिला अधिकाऱ्यांचा तसेच पुरुष अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भाभा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा भारती, राजावाडी रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल राऊत, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, शताब्दी रुग्णालय परिचारिका स्वाती दांगट, विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम संदिकर, प्रशासकीय अधिकारी (शाळा) विजय जाधव, अशासकीय सदस्य वंदना सिंह, सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राच्या कार्यकारी सहायक रोहिणी नाईक तसेच अशासकीय सदस्य स्नेहा खांडेकर यांचा गौरव करण्यात आला.


उपआयुक्त (परिमंडळ-१) चंदा जाधव यांनी यावेळी सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राची आणि त्यामार्फत होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर सह कामगार अधिकारी क्षितिजा कंडारकर यांनी संगणकीय सादरीकरण केले. कार्यक्रमादरम्यान स्त्री मुक्तीबाबत स्नेहा संस्थेतर्फे पथनाट्य तर स्त्री मुक्ती संघटनेतर्फे पोवाडा सादर करण्यात आला. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची

Sejal Pawar : सेजल पवारचं करिअर संपणार ? KEM रुग्णालय मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ तुफान वायरल होत आहेत. एक म्हणजे ३७० ची बिर्याणी आणि डॉ. सेजल पवार हिचं

Mumbai unauthorized schools : दक्षिण मुंबईतील शाळा अनधिकृत; शिक्षण निरीक्षकांकडून टाळे ठोकण्याचे आदेश

MUMBAI : दक्षिण मुंबईतील नामांकित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांमधील काही