तळेगाव: पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल कोसळला. या पुलावर बऱ्याच संख्येने लोकं उभी होती, ज्यापैकी अनेकांनी दुचाकी आणली होती. ज्याच्या अतिरिक्त भारामुळे हा पूल कोसळला असल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोकं पाण्यात वाहून गेली आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफ टीम बचाव कार्य करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, एरव्ही हा पूल पर्यटकांसाठी खुला असतो, मात्र मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक महिन्यांपासून हा पूल वाहनांसाठी बंद होता, असे असले तरी, अजूनही त्याचा वापर लोकांकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
रविवारची सुट्टी म्हणून अनेक पर्यटक व स्थानिक मुसळधार पाऊस आणि नदीची वाढती पाण्याची पातळी पाहण्यासाठी पुलावर जमले होते. पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात मावळ तालुक्यातील भूशी धरण आणि लोणावळा ही लोकप्रिय पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. ही ठिकाणे ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जवळचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये समावेश असलेल्या कुंडमळ्यावर लोकांची गर्दी वाढली, ज्यामुळे हा भीषण अपघात झाला.
रविवारची सुट्टी असल्यामुळे सुमारे १०० ते १२० लोक घटनास्थळी जमले होते
वीकेंड असल्यामुळे इंद्रायणी नदीचा वाढता प्रवाह पाहण्यासाठी सुमारे १०० ते १२० लोक घटनास्थळी जमले होते. काही लोक त्यांच्या दुचाकींसह पुलावर चढले, ज्यामुळे पुलाचा भार आणखी वाढला. जास्त भारामुळे पूल कोसळल्याचे मानले जात आहे. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. स्थानिक पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदर घटनेबद्दल म्हणाले की या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्थानिक आमदार सुनील शेळके म्हणाले की या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तूर्तास मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी लवकरच ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान
या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजूनही अनेक लोक अडकले आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी जात आहे. मी सध्या मृतांची संख्या निश्चित करू शकत नाही. प्रशासन आवश्यक ते सर्व करत आहे."
२५-३० लोक पाण्यात वाहून गेल्याची भीती स्थानिक लोकांच्या मते, हा पूल तीन महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद होता, परंतु तरीही तो खुला होता आणि पर्यटक तिथे पोहोचले. पुलाची स्थिती आधीच वाईट होती. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी वेगाने वाढले आणि पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की पूल कोसळला. या अपघातात सुमारे २५ ते ३० लोक नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे. तर ५ ते ६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले आहे. पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ५-६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे आणि सुमारे १० ते १५ जण अडकल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या या भागात बचाव कार्यासाठी एनडीआरएफ पथके देखील तैनात आहेत.