भरपावसात बेकायदा चाळी जमीनदोस्त
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी नांदप रोड टिटवाळा येथे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केले.आता पाऊस सुरू झाला आहे. पालिका अधिकाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, असा विचार करून भूमाफियांनी टिटवाळा, गाळेगाव, नांदप भागात बेकायदा चाळी उभारण्याचे काम हाती घेतले होते. याविषयीची माहिती मिळताच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी जेसीबी आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने या बेकायदा चाळी, व्यापारी गाळे जमीनदोस्त केले.
मागील पाच महिन्यांपासून टिटवाळा, मांडा परिसरातील अ प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामांच्या विरुध्द जोरदार तोडकाम मोहीम सुरू आहे. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी अ प्रभागाकडून घेतली जात आहे. पाऊस सुरू झाला असल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष नाही. आपण घाईने बांधकाम पूर्ण करून टाकू, असा विचार करून भूमाफियांनी नांदप रस्ता टिटवाळा येथे बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू केले होते. अशाच पद्धतीने गाळेगावमधील शांताबाई नगर भागात अ प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाला अंधारात ठेऊन ही बेकायदा बांधकामे केली जात होती. या बांधकामांना पालिकेच्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या.
या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडे प्राप्त होताच, त्यांनी या बांधकामांची खात्री करण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण विभागातील कर्मचारी पाठविले. ही बेकायदा बांधकामे घाईघाईने पूर्ण केली जात आहेत, अशी माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी जेसीबी, तोडकाम पथक घेऊन साहाय्यक आयुक्त पाटील टिटवाळा नांदप रस्ता येथे दाखल झाले. त्यांनी निर्माणाधिन बेकायदा बांधकामे जेसीबी आणि तोडकाम पथकाच्या माध्यमातून जमीनदोस्त केली. ही बांधकामे तोडल्यानंतर तोडकाम पथकाने गाळेगाव शांताबाई नगर येथे जाऊन तेथे उभारण्यात येत असलेले बेकायदा खोल्या आणि व्यापारी गाळ्यांचे बांधकाम जमीनदोस्त केले.
या कारवाईच्यावेळी अ प्रभागातील अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, तोडकाम ठेकेदाराचे १० कामगार उपस्थित होते. एकीकडे पाऊस सुरू असताना दुसरीकडे तोडकाम पथकाने पावसाची पर्वा न करता ही बेकायदा बांधकामे तोडून टाकली. पाऊस सुरू असला तरी निर्माणाधिन बेकायदा बांधकामे तोडण्याची कार्यवाही सुरूच राहणार आहे.
पाऊस सुरू झाला म्हणून पालिका आता बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार नाही या भ्रमात भूमाफिया, नागरिकांनी राहू नये, असे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले. गेल्या पाच महिन्यांपासून टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू आहे.