महाराष्ट्रताज्या घडामोडी

मुंबईतून लवकरच कोकणासाठी सागरी रो रो सेवा - नितेश राणे

  9

रत्नागिरी : लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी आज येथे दिली.


रत्नागिरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दळणवळण व्यवस्था भक्कम करतानाच रस्ते आणि रेल्वेसोबतच जलवाहतूक वाढावी यासाठी फडणवीस सरकार प्राधान्य देत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माझगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असून, तेथून थेट रत्नागिरीपर्यंत तीन तासांत तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पावणेपाच तासांत पोहोचता येणार आहे. या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माझगाव येथून सोडणार आहोत. यासाठी लागणारी मोठी बोट म्हणजेच क्रूझ महाराष्ट्रात किनारपट्टीवर आली आहे. फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील आणि गणेश चतुर्थीपूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.


मुख्यमंत्र्यांनी कोकणातीलच आमदाराकडे मत्स्य आणि बंदर ही खाती देऊन दूरदृष्टी दाखवली आहे. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये वाढवण बंदर तर सुरू होत आहेच; पण त्याच वेळी राज्यातील १५ बंदरांना अधिक बळकट करून त्यांना आर्थिक ताकद देण्याचे काम सरकार करत आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदरात यापूर्वी अनेक अनधिकृत गोष्टी घडत असत. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना त्याचा त्रास सहन करावा लागत असे. मात्र, आता तेथील गैरप्रकार थांबवून बंदराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आमच्या खात्याने पावले उचलली असून, २२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद तिथल्या विकासासाठी करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न आहे. लवकरच मिरकरवाड्याचा विकास खऱ्या अर्थाने मार्गी लागेल, असे राणे म्हणाले.


गेल्या काही दिवसांमध्ये अवैध मासेमारी त्यातही एलईडी फिशिंगवर मोठ्या प्रमाणात केलेल्या कारवाया, ड्रोनद्वारे होणारी कारवाई यामुळे अवैध मासेमारीवर नियंत्रण आणण्यात आम्हाला चांगले यश आले आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनातही वाढ झालेली दिसून येत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जी शिस्त किनारपट्टीवर सागरी सुरक्षेच्या माध्यमातून आणायची आहे त्यातसुद्धा निश्चितपणे यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना नीतेश राणे म्हणाले, वादळामुळे किंवा पावसामुळे जसे शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच ते मच्छिमारांचेही होते. त्यामुळे जी नुकसानभरपाई शासनाकडून शेतकऱ्यांना दिली जाते तीच नुकसानभरपाई मच्छीमारांनाही अपेक्षित होती. मात्र, हे निकषांमध्ये कसे बसवायचे हा प्रश्न होता. मात्र, आता कृषी दर्जा दिल्यामुळे नुकसानभरपाईसह विम्याचे लाभ, आवश्यक साधनसामग्री, शासकीय अनुदान, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्याचाही लाभ आता शेतकऱ्यांसह मच्छिमारांना होणार आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. म्हणूनच फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे.


जिल्हा बँका आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या महत्त्वाच्या असंख्य योजना आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळते, त्याच योजना मच्छीमारांनाही लागू कराव्यात, त्या पद्धतीने निर्देश प्रत्येक जिल्हा बँकेला, विशेषतः किनारपट्टीवरील बँकांना द्यावेत, राज्यातील गोड्या पाण्यातल्या मत्स्य शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनास्कर यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य करतानाच त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या वतीने हजार कोटीच्या निधीची मच्छीमारांसाठी तरतूद केली असून, योजना बनवण्याचे काम सुरू झाले आहे. मच्छिमारांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद राज्य सहकारी बँकेने केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.


सध्या सागरी मत्स्य उत्पादनात सहाव्या आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात सोळाव्या ठिकाणी असणाऱ्या राज्याला आगामी काळात पहिल्या पाच राज्यांमध्ये नेण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पांडुरंगाच्या भेटीसाठी नवी लालपरी

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवीन लालपरी दाखल होत आहे.

पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खेलो इंडिया आणि विद्यापीठ विकास फंडातून २० कोटी

मराठा समाजाकडून लग्नसोहळ्यांसाठी आचारसंहिता जाहीर

अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी घटनेनंतर लग्नातील हुंडा, मानपान आणि शाही सोहळ्यांच्या