Monday, May 19, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. यात तीन डोंबिवलीकर, दोन पुणेकर आणि एक पनवेलचा रहिवासी आहे. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांपैकी तीन जणांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पर्यटकांनी तसेच घटनास्थळाच्या आसपास असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे ही रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.



ज्या तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत त्यांची कोडनेम अर्थात सांकेतिक नावं सुरक्षा पथकांना कळली आहेत. ही नावं मुसा, युनुस आणि आसिफ अशी आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची खरी नावं आहेत. या अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरक्षा पथकांनी संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये शोध मोहीम हाती घेतली आहे.



सुरक्षा पथकांनी पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी झालेल्या तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहे. या अतिरेक्यांना जीवंत अथवा मृत ताब्यात घेण्यासाठी सुरक्षा पथकांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.



रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या लष्कर – ए – तोयबाशी संबंधित एका गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. प्रत्यक्षात हा पूर्ण हल्ला पाकिस्तानमधूनच नियंत्रित झाला आणि लष्कर – ए – तोयबानेच अंमलात आणला, असे सूत्रांकडून समजते. आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसारच पहलगाममध्ये हल्ला झाल्याचे सूत्रांकडून समजते. या हल्ल्याच्या उद्देश जम्मू काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीला खीळ बसवणे हाच होता. यामुळे लवकरात लवकरच अतिरेक्यांचा बीमोड केला तरच परिस्थिती सुधारेल, असे समजते.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यापैकी सहा जण महाराष्ट्रातील आहेत. या घटनेनंतर सुरक्षा पथकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये तसेच देशात इतरत्र अनेक महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तर प्रमुख रस्त्यांवर सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठिकठिकाणी नागरिकांची अंगझडती तसेच त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी सुरू झाली आहे. सुरक्षा पथकाने जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात दोन अतिरेक्यांना ठार केले आहे.
Comments
Add Comment