वाहनावर फास्टॅग लावा अन्यथा दुप्पट पैसे भरा

मुंबई (प्रतिनिधी): प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणे तसेच रोख देयकांसाठी (पेमेंट) दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण आम्हाला आढळून नाही, असे निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. त्यानंतर आता १ एप्रिलपासून राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोखरक्कम द्यावी लागणार आहे.



टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ व फास्टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आल्याचं एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.



‘या’ टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य?

मुंबईतील पाच टोलनाके एमएसआरडीसीकडे आहेत. मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली, दहिसर आणि वाशी या पाच टोल नाक्यांवर स्कूल बसेस, हलकी मोटार वाहने आणि राज्य परिवहन बसेसना कोणताही टोल आकारला जात नाही. तर, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, सोलापूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, नागपूर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, छत्रपती संभाजी नगर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, काटोल बायपास आणि चिमूर-वरोर-वणी महामार्गचं व्यवस्थापनही एमएसआरडीसीकडे आहे. या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फास्टॅग अनिवार्य आहे. अन्यथा वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत.



फास्टॅग सक्तीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम

मुंबईत हलक्या वाहनांना, शाळेच्या बसला पथकरमाफी आहे. त्यानुसार मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही पथकर नाक्यांवर या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असून तेथे फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, एमएमआरमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांना फास्टॅग नसण्याची शक्यता आहे. पण यापुढे त्यांनाही फास्टॅग प्रणालीशी खाते जोडावे लागेल. कारण वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि अटल सेतूवर पथकर वसुली करण्यात येते. तेथे कोणत्याही वाहनांना पथकरमाफी नाही. त्यामुळे तेथे प्रवास करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य आहे.

टोल चुकवेगिरीला बसणार आळा

अनेक जण टोल चुकविण्यासाठी ओळखपत्रांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकदा पत्रकार, पोलिस, आयकर अधिकारी व अन्य शासकीय प्राधिकरणाचे अधिकारी सांगून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना आढळून येतात. यामुळेही टोनाक्यावर वाहतुक कोंडी बराच वेळ वाढत असते. टोल भरण्यास नकार देणाऱ्या ओळखपत्रधारी ‘व्हीआयपी’ना स्थानिक पोलीस ठाण्याच्या हवाली सोपविण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व