ऋतुराज – ऋतुजा केळकर
‘कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा…
क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा…
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था…
कर्तव्याने घडतो माणूस
जाणून पुरुषार्था…’
लहानपणी आमची सकाळ ११ वाजता. कामगारसभा, त्यात बरेचदा कवी मनोहर कवीश्वर यांच्या या गीताला सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजाच्या साथीने व्हायची. खरतर ते वय काव्य कळण्याइतपत जाणत नव्हतच पण तरीही तेव्हाही ते शब्द जेव्हा फडके साहेबांच्या आवाजात संपूर्ण घरात घुमायचे तेव्हाही कुठेतरी आतून ढवळून यायचं, घशात एक आवंढा यायचा की, जो आजही येतो तितक्याच आर्ततेने. अवचितपणे काळाची वेणू अलवारपणे कान्हा वाजवत राहिला आणि जसजशी मी मोठी होत गेले तसंतसे त्यातील शब्दांचा अर्थ अधिकाधिक ठळकपणे उलगडत गेला.
कसं आहे ना की, प्रसंगानुरूप माणसांची ओळख ही त्याच्या प्रथम स्वरूपी नम्र स्वभावाने तसेच वर्तणुकीने होते. विचाराने, आचाराने आणि अनुभवाने परिपक्व माणसे हे नेहमीच गोड बोलतात. तसेच अशा व्यक्तींच्या वागण्यात तसेच चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असतो. अशा व्यक्ती आपले आप्त सखे किंवा बंधू असणे हे अत्यंत सौभाग्याचे लक्षण आहे. पण हे जरी सत्य असले तरीही ते कायम सोबतच राहतील याचा कुठलाच विश्वास या वियोगनिष्ठ जीवनात देता येत नाही. कारण वियोगाची भरजरी किनार असलेले कर्माची मऊशार शाल ओढून आणि अकल्पित अद्भुत संभव-असंभावाचे भूकलाडू – तहानलाडू सोबत घेऊनच सटवाईच्या हाताने कंकणे भरून आपण या पृथ्वी तलावर अवतीर्ण झालो असतो म्हणूनच असेल कदाचित दिलेले विविक्षित कार्य करून ‘पुनरपि जननम पुनरपि मरणम’ असे म्हणत म्हणत रित्या हस्ताने आपण जन्म घेतो आणि रित्या हस्ताने परत सारे माझे माझे म्हणत जे काही आयुष्यभर कवटाळून हृदयाशी ठेवलेले असते ते इथेच टाकून पुन्हा एकदा आपला आत्मा जन्म मृत्यूचा खडावा घालून पुढच्या प्रवासाकरिता निघून जातो.
मग काळझोपेची व्याख्या ती काय? कधी न जाग होण्याकरिता, मऊ सप्तरंगी मोरपिसाची दुलईत आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या बाळाइतक निरागस, शांत, सुरक्षित, झोप? की एक शरीर त्यागून पुन्हा नवे पान, नवीन माणसं, नवे भोग, नव्याने सुरुवात करणं? मग या जन्मी अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षांचं काय? की ज्याच्यावर आपण मनःस्वी प्रेम करतो, आपलं सर्वस्व मानतो त्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला इवला ही वेळ नसावा? आपण मारलेली हाक ऐकून न ऐकल्यासारखी करून आपण समोरून निघून जाणारी, कायम आपल्यावर अविश्वास दाखवणारी, आपल्या भावनांशी चक्क खेळणारी ही माणसं खरोखरच आपलेच जिवलग असतात का? की ही आपलीच भ्रामक कल्पना? पण मग ज्यांनी आपल्याला इतक्या टोकावर आणलं, त्या काळझोपेची अनिवार ओढ लावली त्यांना शिक्षा कोण देणार? मग जन्मोजन्मीच्या ऋणांच्या या कल्पना ही चुकीच्याच का? मग कदाचित आपल्या जाण्याने तरी, आपल्याकरिता डोळ्यातून एक तरी अश्रू येईल का यांच्या? की नुसता एक ‘‘रिप”? की तोही नाहीच? का बरं बरेचदा आपली हाक त्या आपल्या प्रियजनांपर्यंत पोहचत नाही?
मग आपला मृत्यू तरी कसा यावा? नैसर्गिक की आत्महत्या करून? काय विचार असतील त्या शेवटच्या घटकेला मनात त्या व्यक्तीच्या? शेवटी काय तर या मानसिक छळातून सुटकाच ना? मग तो कसा का येईना, तिरस्कार, अवहेलना, पदोपदी अवमान सहन करण्यापेक्षा निदान नवीन जन्मात नवीन सुरुवात तर करता येईल!
पण असं नसतं. आपले भाग्य हे नेहमीच आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देते. जर का आपण पुण्य कर्म खरोखरच केली असतील तर आगीतूनही आपण सहीसलामत बाहेर पडतो तिथे या क्षणभंगुर संकटांचा काय पाडाव लागणार? पण अगदी माझ्याच शब्दात सांगायचं झालं तर नेहमीच,
सब फूल लेकर गए…
मैं कांटे ही उठा लायी…
पड़े रहते तो…
किसी को गहरे…
बहुत गहरे…
जख्म दे जाते…
असं नसतं कारण शब्दांना मार्दव्याच्या आणि संस्कारांच्या अलंकारांनी सजवून कितीही नजराणे पाठवले ना तरी देखील भावनांची आणि नात्यांची समोरच्याने देखील कदर करावी लागते. जर तसं झालं असतं तर नात्यात पडत चाललेले ब्लोकेजेस कधीच संवादाच्या एन्जोप्लास्टीने पटकन काढता आले असते. म्हणूनच गरज आहे त्या तो परमपिता परमेश्वर आणि आपण वेगळे नसून एकच आहोत हे ओळखून आपण जी जी कृती करतो ती आपण करत नसून ती त्याच्या इच्छेने घडून येते असे म्हटले तर प्रत्येक प्रसंगात आपण योग्य तीच कृती करू की जेणे करून आपले कर्म ही तितकेच निष्काम होऊन मुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल सुखकर होईल. पर्यायाने आपल्या पुरुषार्थाचा झेंडा या त्रिखंडात लहरत राहील.