ठाणे : बनावट नंबर प्लेट लाऊन होणारे गुन्हे, रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबर प्लेट वरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरतो आहे, यावर उकल म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” बसविणे अनिवार्य केलं आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत कडक धोरण अवलंबले असून ३० मार्च २०२५ पर्यंत ठाण्यातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणे बंधनकारक रहाणार आहे.
Svamitva Scheme : स्वामित्व योजना शेतकऱ्यांसाठी कशी ठरणार लाभदायक ?
व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या
ठाण्यात व्यक्ती इतक्याच वाहनांची संख्या असल्याचा आभास होतो. रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे हे देखील समजून येत नाही कधी नंबर प्लेट नसणारी किंवा खोट्या नंबर प्लेट लावून वाहने चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र अशा वाहनांचा कळत नकळत एखादा गुन्हा घडला, तर त्याला शोधणे खूप अवघड होऊन जाते. अशा नंबर प्लेट वरून राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठण्यसारखी परिस्थिती देशभरात असून याच पार्श्वभूमीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” लावण्याची सूचना केली आहे. या बाबत राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने याची गंभीर दखल घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व वाहनांना ३० मार्च २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
ठाण्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी जी वाहने आहेत अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे. या कामासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. अनधिकृत विक्रेत्याकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनाची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेस मध्ये होणार नाही. यामुळे १ एप्रिल २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते असे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले आहे