लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने या टोल रोडची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. लाखो रुपयांची टोल वसुली केली जाते, मात्र देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासाबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला काही घेणे – देणे राहिलेले नाही, असे चित्र दिसून येत आहे.
Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!
या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता उखडलेला आहे. पुणे ते सोलापूर या दरम्यान साधारण २६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दौंड तालुक्यात सन २०१० ते २०१२ दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण झाले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रुंदीकरणानंतर रस्ता मोठा झाला, वाहनांचा वेग वाढला. टोल वसुली जोमाने सुरू झाली. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. महामार्गाची दुरवस्था अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची गांभीर्याने व तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. महामार्गाच्या मुख्य लेन आणि सेवा रस्त्यावर सतत लहान, मोठे खड्डे पडलेले दिसून येतात. डांबर, खडी उखडलेल्या अवस्थेत असते, अशा गंभीर प्रकारामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.
मोकाट जनावरांचा वावर वाढला असून तेही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. नादुरुस्त वाहनांसाठी तत्काळ सुविधा मिळत नसल्याने ती वाहने तासनतास महामार्गावर उभी असतात. अशा वाहनांना धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोलीसह महामार्गावर इतर ठिकाणी असे अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे. यासंदर्भात कोणी काही बोलत नसल्याने या संबंधित प्रशासनाचा अधिकारी वर्ग, टोल विभाग सुस्त झाला आहे.
वारंवार भीषण अपघातात जखमी होतात, अपंगत्व येते, जीव गमवावा लागतो. पोलिस पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.