ऋतुराज – ऋतुजा केळकर
एकदा एका माणसाने एका साधूला सांगितले की, असे काही तरी मला सांगा की, जे मला कायम उपयोगी होईल तेव्हा साधूने त्याला सांगितले की, ‘प्रत्येक गोष्ट ही बदलत असते जे काल आहे ते उद्याकरिता तसेच राहील असे नाही.’
आज तारीख आहे, २५ डिसेंबर. जगभरात हा दिवस ‘ख्रिसमस’ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. येशू ज्यांचे आज जगात अनेकानेक अनुयायी आहेत. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक म्हणून त्यांना देव म्हणून पूजले जाते पण, २५ डिसेंबर ही तारीख हिंदू धर्मात देखील अतिशय महत्त्वाची आहे याची जाणीव बऱ्याचशा हिंदूना नाही. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी समोर आपलेच आप्तस्वकीय युद्धाकरिता उभे असलेले पाहून अर्जुन शस्त्र गळून कुरुक्षेत्रात हताश झाला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कर्मयोगाचा सिद्धांत अत्यंत सोपी-सोपी उदाहरणे देऊन विषद केले होते आणि त्याचे भय नाहीसे करून कौरवांवर विजय मिळवण्याकरिता त्याला प्रवृत्त केले आणि मग महाभारतातील सर्वात मोठे युद्ध कुरुक्षेत्र येथे झाले, श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे जे रहस्य सांगितले ते हिंदू धर्माकरिता अत्यंत पावन असा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय.
गीता, गंगा, गायत्री,
सीता, सत्या, सरस्वती|
ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी||
अर्धमात्रा, चिदानंदा,
भवग्नी, भयनाशिनी|
वेदत्रयी, परा,
अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी||
हा एक असा श्लोक आहे की, ज्याच्या पठणाने संपूर्ण गीतेचे पठण केल्याचे पुण्य प्राप्त होते. आपला धर्मग्रंथ म्हणजे ही भगवद्गीता. हा फक्त एक अध्यात्मिक ग्रंथ नसून त्यात संसारिक भवसागर निर्विघ्नपणे कसा तरुन जावा याचे ही ज्ञान देण्यात आले आहे. कालानुरूप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात देखील बदल करण्यात आला आहे; परंतु गीता हा असा ग्रंथ आहे की, जो आज ही वाचला तरीही त्यातून आजच्या काळातील म्हणजे दोन हजार चोवीस – पंचवीस सालातील प्रश्नांची देखील उत्तरे अगदी सहजगत्या मिळतात. सुरुवातीला मी जी गोष्ट सांगितली ती भगवद्गीतेतील मांडलेल्या सिद्धांताकरिता अजिबात चुकीची ठरते. कारण ऋतूचक्राच्या पानगळीत अनेक ऋतू येतात जातात. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रश्न निर्माण होतात की अगदी , ‘डू ऑर डाय’ अशी स्थिती निर्माण होते मग ती कुठल्याही धर्माची व्यक्ती असो. जर का गीतेचा अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की, आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर यात आहे.
कसे आहे ना की, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करणाऱ्यापेक्षा फुकट सल्ला देणारे बरेचजण पावलोपावली भेटतातच पण, कुणाचा सल्ला मोलाचा आहे आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे हे आपण आपल्याशी, मनाशी पक्क ठरवणे गरजेचे असते.
अर्थात काहीजण म्हणतीलही की, ‘हे म्हणजे वृद्ध पिंपळाचा सल्ला घेऊन आपल्या नवनिर्मित तसेच आधुनिक आयुष्याची पायाभरणी करण्यासारखं आहे. पण कसं आहे ना की, ‘कुठलाही सृजनगंध लाभलेला अनुभव हा फोडणीत जशी मोहरी टाचेवर तडतडून तडकून पदार्थाला एक परिपक्वता देते ना तसा असतो किंवा कपाळाच्या लालजर्द चंद्रकोरीवर तेजस्वी हल्द्फुलांच्या गंधाने मोहरून निघालेली गोंदणे म्हणजे ते वृद्ध पिंपळाचे म्हणजेच भगवद्गीतेचे मार्गदर्शन असते. जर का या मार्गदर्शनाकडे दुर्लक्षून आपण आणि धर्माच्या गळ्यामध्ये आधुनिकीकरणाच्या अणकुचीदार नखांना करकचून रुतवली, तर मग आपल्याच भविष्याच्या आकांत विभोर पाचोळ्याच्या धुराला सर्वत्र उडून जातकुळीचे वावटळ आपल्याला अस्य अलौकिक विभ्रमात अडकवून ठेवेल की, आपल्याच स्वप्नमयुराच्या आभासाच्या पाऊलखुणा आपल्या अस्तित्वाच्या निरांकुशतेचे, संभ्रमाचे खेळ रंग बदलत्या ढगांप्रमाणे हातात येता येता निसटून जाईल. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या संधीप्रकाशात नदीच्या धीरगंभीर प्रवाहात अशाच एका सायंकाळी आपले अस्थिविसर्जन होता होता श्यामल संध्येलाही हुंदका दाटून यावा असे जर वाटत असेल, तर भेट विरह आणि अस्ती विसर्जन यांच्या भरजरी सौंदर्याची ओळख आपल्या आत्म्याला पटवून देऊन पायाभरणीचा दगड मजबूत करण्याकरिता भगवद्गीतेचे महत्त्व जाणून तिला आपल्या आयुष्याच्या जुगारात असे आत्मसाद करून ठेवा की वियोग आणि निष्ठा यांच्या मनधरणीत देहाच्या गंधपुष्करात अध्यात्माचे चकोर चांदणे नेहमीच ओथंबलेले राहिले पाहिजे. तसेच भगवद्गीतेच्या ललितमय चिंतनाने आपल्या अमृत विचारांच्या गंगानी आपल्या अस्तित्वाच्या घुंघुरघंटांचे जोडदुवे खळकन निसटून इप्सितस्थळांच्या शोधवाटेवर आर्तपणे समग्र जीवनाचे गीत वातावरण चिरत जाणाऱ्या एखाद्या गढवाली लोकगीताच्या लकेरीप्रमाणे विविधतेच्या बहराने नवा कालमंत्र देऊन आपण अनंतात विलीन व्हावे. म्हणजे अगदी माझ्याच शब्दात सांगायचे झाले तर …
“गीतेच्या केशरगंधित अत्तराची कुपी … माझ्या रेशमी वस्त्रावर सांडली…
आणि …
माझ्या आत्म्याचा औदुंबर…
अलौकिक इप्सितस्थळावरील…
दीपस्तंभ जाहला…”