Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीअमरावतीची करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकरला 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार'

अमरावतीची करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींचा शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.

या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा १४ राज्यांमधील १० मुली व ७ मुले असे एकूण १७ मुले या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.

Maharashtra Holiday List 2025 : सुट्ट्यांची यादी जाहीर! १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे सर्व सण पहा एका क्लिकवर!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २०२२ पासून २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय ९) आणि बाबा फतेहसिंग (वय ५) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाएवजी वीर बाल दिवस म्हणजेच २६ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.

करीना थापाचे शौर्य : ७० कुटुंबांचे प्राण वाचवले

अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने ७० कुटुंबांचे प्राण वाचवले. बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, करिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडरजवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

केया हटकर : साहित्य आणि समाजकार्याची ओळख

मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या “Dancing on My Wheels” आणि “I M Possible!” ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. १३ वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य २६ देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केयाला १० महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसितआहे, ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हीलचेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. ती स्वतःला “SMA-ART” म्हणवते आणि विविध व्यासपीठांवर प्रेरणादायी भाषणे देते. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले.

भारत मंडपम येथे राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर राजधानीतील भारत मंडपम येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवसाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी उपस्थित होते. हा कार्यक्रम युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या अतुलनीय गुणांची दखल घेऊन, भविष्यात नवीन भारताच्या निर्मितीसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात अन्नपूर्णा देवी यांनी मुलांच्या रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले आणि वीर बाल दिवसाचे उद्देश स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपोषित पंचायत अभियानाचे उद्घाटन केले. पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी बळकट करून आणि सक्रिय सामुदायिक सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम आणि कल्याण हा या कार्यक्रमाचे उद‍िष्ट आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवर व्यक्तींसह सुमारे ३५०० मुले सहभागी झाली. मुलांनी विविध भारतीय संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्च पास्टमध्ये भाग घेतला.

यासोबतच, युवा मनांना गुंतवून ठेवण्यासाठी, या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जातील. MyGov आणि MyBharat पोर्टलच्या माध्यमातून परस्पर संवादात्मक प्रश्नमंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका आयोजित केल्या जातील. शाळा, बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, सर्जनशील लेखन, भित्तीचित्रे तयार करणे यासारखे मनोरंजक उपक्रम हाती घेतले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -