पंढरपूर : भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची… उभी पंढरी (Pandhari) आज नादावली… तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी…जीवाला तुझी आस का लागली! विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (ता. १२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ तासांचा अवधी लागत होता.
कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नदीत स्नानाची पर्वणी साधल्यानंतर बहुतांश भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पत्रा शेड दर्शन उभे होते तर दिंडीतील वारकरी नगरप्रदक्षिणेला निघाले होते. कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा, मुखी पुंडलिक वरद हा घोष, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका व हाती टाळ मृदुंग हा परिवेश धारण करून नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंडीतील भाविकांच्या जयघोषाने पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या अथांग गर्दीने फुलून गेला होता.
श्री विठ्ठल मंदिर सभोवतालच्या परिसरामध्ये होणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने यंदा प्रथमच बेरीकेडिंग करण्यात आले होते. श्री संत नामदेव पायरी व पश्चिम द्वार परिसरामध्ये इंग्रजी व्ही आकाराचे बेरीकीडिंग केल्यामुळे गर्दीचे विभाजन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करणे सुलभ झाले होते.
कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं. ‘विठ्ठल आमचे जीवन’ या थीमवर आधारित मंदिराला केलेली सजावट व फुलांच्या सजावटीमध्ये तयार केलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा पाहून भाविक आनंदीत झालेले दिसून आले. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यानच कार्तिकी एकादशीचा सोहळा आला आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील गावोगावचे बहुतांश भाविक आपापल्या नेत्यांच्या प्रचारात गुंतले आहेत. त्याचा परिणाम कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर देखील झाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांच्या संख्येत २५ ते ३० टक्के घट झाली आहे असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. भाविकांच्या संख्येत घट झाल्याने पंढरीतील (Pandhari) प्रासादिक साहित्य विक्री व्यावसायिकांसह हॉटेल, लॉजेस यांच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…