ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार
वर्धा : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची (Wardha Accident) बातमी समोर आली आहे. नागपूर मुंबई महामार्गावर (Nagpur Mumbai Highway) एका ट्रकने रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरुन रिक्षाचालकासह सात जणांना घेऊन रिक्षा पुलगावकडे जात होती. आठवडी बाजारात खरेदीसाठी हे सर्वजण निघाले होते. यावेळी केळापूर शिवारात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर दुर्गाबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला. भीमराव पाटील व सुनीता कौराती यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.
याबाबतची माहिती मिळताच केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असलेल्या तिघांची जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर गावावर शोककळा पसरली आहे.