Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

MP News : दिल्लीतल्या बुरारी प्रकरणाची मध्यप्रदेशात पुनरावृत्ती! दिवसही १ जुलैचाच!

MP News : दिल्लीतल्या बुरारी प्रकरणाची मध्यप्रदेशात पुनरावृत्ती! दिवसही १ जुलैचाच!

मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत


भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८ रोजी घडलेल्या बुरारी मृत्यू प्रकरणाने (Delhi Burari Deaths) अवघा देश हादरला होता. एकाच कुटुंबातील लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजीपर्यंत ११ जणांनी आत्महत्या केली होती. आता सहा वर्षांनंतर त्याच दिवशी मध्यप्रदेशातही (Madhya Pradesh) अशीच एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील अलीराजपूर (Alirajpur) येथे एकाच घरात पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. यामध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह आहेत. ही हत्या की सामूहिक आत्महत्या यासंबंधी सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस स्टेशन हद्दीतील रावडी गावात ही घटना घडली. मृतांमध्ये घराचा प्रमुख राकेश, त्याची पत्नी ललिता आणि मुलगी लक्ष्मी, दोन मुलं अक्षय आणि प्रकाश यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाचा खून झाल्याची भीती नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.


दिल्लीतील बुरारी मृत्यू प्रकरणाप्रमाणे तोच दिवस, तीच पद्धत अगदी सगळं सारखंच असल्याने या जुळून आलेल्या योगायोगाने गावकऱ्यांना धडकी भरली आहे. अलीराजपूर येथील या मृतदेहांबद्दल माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी पोहोचले. ही हत्या की सामूहिक आत्महत्या? हे एफएसएल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच हे स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.



काय आहे दिल्लीतील बुरारी मृत्यू प्रकरण?


दिल्लीमध्ये ३० जून २०१८ रोजी रात्री उशिरा १२ ते १ वाजण्याच्या सुमारास चुंडावत कुटुंबातील (ज्यांना भाटिया कुटुंब असंही म्हणतात) ११ जणांनी आत्महत्या केली. पाईपला गळफास घेत, संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवलं होतं. घरातील दहा जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तर कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्य असलेल्या वृद्ध महिलेचा मात्र गळा आवळून जीव घेतला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे १ जुलै २०१८ रोजी त्यांच्या मृत्यूनंतर पहाटे घरातून त्यांचे मृतदेह सापडले.


या घटनेमुळे दिल्लीच नाहीतर संपूर्ण देश भेदरुन गेला होता. पुढे अनेक दिवस या प्रकरणाचा तपास सुरू होता. बुरारी प्रकरणात, असा दावा करण्यात आला होता की, कुटुंबप्रमुख ललित भाटिया यानं जादूटोण्याच्या प्रभावाखाली संपूर्ण कुटुंबाला सामूहिक आत्महत्या करण्यास भाग पाडलं होतं. ११ मृत्यू हे मनोविकारामुळे झाल्याचं मानलं गेलं होतं. या घटनेला आज ६ वर्षे पूर्ण झाली आहेत व त्याच दिवशी तशाच प्रकारची घटना मध्यप्रदेशातून उघडकीस आली आहे.


Comments
Add Comment