पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन खात्याचे आदेश
पनवेल : पनवेलसह नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई उपनगर ते कल्याण, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही वन खात्याने बंदी घातल्याने, पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.
खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वन खात्याने या ठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पांडवकडा धबधबा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना, त्या ठिकाणी प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. वन विभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच या ठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पर्यटकांच्या जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे.
पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहणार असल्याची माहिती वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देविदास सोनावणे यांनी सांगितले.
कर्नाळा अभयारण्यावर निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार
गाढ़ेश्वर डॅम, गाढी नदी पात्राजवळील धबधबे या ठिकाणी बंदी असणार आहे. दरवर्षी या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. कर्नाळा अभयारण्यात करता येणार निसर्ग पर्यटन शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली गेली असली, तरी कर्नाळा अभयारण्यासारख्या (Karnala Sanctuary) प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे.