
तिघांनी पोहत किनारा गाठला, दोघांचे मृतदेह सापडले तर दोघांचा शोध सुरु
सिंधुदुर्ग : नाशिक, उजनी, प्रवरा या ठिकाणी गेल्या तीन दिवसांत सलग घडलेल्या बुडण्याच्या घटनांमुळे १८ जणांनी आपले जीव गमावले आहेत. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हळहळत असतानाच आणखी एक बुडण्याची घटना सिंधुदुर्गातून (Sindhudurga news) समोर आली आहे. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये (Vengurla) मासेमारी (Fishing) करणारी एक बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ७ खलाशी होते. या ७ जणांपैकी तिघांनी पोहत किनारा गाठला. मात्र, बेपत्ता असलेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले तर दोघांचा अजून शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारी बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. काल रात्री हे सर्वजण मच्छीमारीसाठी लागणारा बर्फ घेऊन बोटीतून निघाले होते. मात्र, अचानक सुरु झालेल्या वादळी वार्यामुळे ही बोट हेलकावे खात पाण्यात बुडाली. ७ मच्छीमारांपैकी तिघांनी पोहून किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र उर्वरित चौघांपैकी दोन जणांचे मृतदेह सापडले. उरलेल्या दोन जणांचा शोध सुरु असून ते दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. अन्य होड्यांमधून दोघांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू आहे.