- हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत येणार; ८२३ कोटींची तरतूद
- वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु होणार
- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
मुंबई : मुंबई-नायगाव-जुचंद्र असा नवा बायपास टाकून बोरीवली हे कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे भरलेल्या कोकणवासियांच्या मेळाव्यात दिली. याचवेळी हार्बर मार्ग बोरीवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरीवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरीवलीला जोडण्यात यावा तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु करण्यात यावी, अशा तीन मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या. त्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
हार्बर रेल्वे बोरीवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रूपयांची तर नायगाव – जूचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वे मंत्र्यांनी दिली.
उत्तर मुंबईतील कोकणवासीयांशी संवाद साधून रेल्वेबाबतच्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. यावेळी ‘कसे आसात, बरे आसात ना’ असे मालवणी भाषेत कोकणवासियांना विचारताच कोकणवासीयांना आनंद झाला. ‘आम्ही बरे आसू’ म्हणत कोकणवासियांनी त्यांना प्रतिसाद दिला.
या मेळाव्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, मनीषा चौधरी, सुनील राणे, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, विजय (भाई) गिरकर उपस्थित होते.