मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, ही सफाई योग्यप्रकारे नसून संबंधित कंत्राटदारांकडून मिठी नदी डेब्रीज टाकून त्यात गाळ टाकून या गाळाचे वजन वाढवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे केली. त्यामुळे याची योग्यप्रकारे सफाई करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत डॉ सईदा खान हरकतीच्या मुद्दयाद्वारे मिठी नदीतील गाळाच्या सफाईबाबत व्हिडीओ प्रदर्शित करून कशाप्रकारे सफाई योग्यप्रकारे होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी बोलतांना डॉ सईदा खान यांनी मिठी नदीच्या गाळाची सफाई २८ टक्के झाल्याचा दावा प्रशासन करत असले तरी कंत्राटदार हा गाळाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याठिकाणी इमारत बांधकामाचा राडारोडा नदी टाकतो. त्यावर गाळ टाकून ते ट्रकमध्ये भरुन घेवून जातो. त्यामुळे ट्रकमधून नेण्यात येणाऱ्या गाळाच्या प्रमाण अधिक दिसत असले तरी प्रत्यक्षात तिथे योग्यप्रकारे सफाई होत नाही आणि अशाप्रकारे करदात्यांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यामुळे लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाप्रकारे चालला जाणारा हा कारभार इथेच रोखला गेला पाहिजे, नाहीतर सन २००५ प्रमाणे परिस्थिती उद्भवली जाईल, त्यामुळे पुन्हा मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती असून असे घडल्यास मुंबईकर आपल्याला माफ करू शकणार नाही. यावेळी सईदा खान यांनी मिठी नदीच्या पात्रात डेब्रीज पडलेले आणि त्यावर टाकला जाणार गाळ यांचा व्हिडीओच अध्यक्षांना दाखवला. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रकार गंभीर असून सदस्याने मांडलेल्या मुद्दयावर योग्य उत्तर देईपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला जातो असे जाहीर केले.






