उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरिनलाईन्स सागरी सेतू मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दरम्यान केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. काही लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
कोस्टल रोडच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कशाप्रकारे वसुली करायचे याचा तपशील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला. कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या, असे सांगितले जायचे. त्यावेळी या भागात कोण आमदार होते, हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याविषयी बोलणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
एवढंच नाही तर मी सगळं करून आणलं पण ज्यावेळी भूमिपूजन करायचं होतं, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, पण उद्धव ठाकरेंनी मला बोलवलं देखील नाही. त्यावेळी मी सगळं रोखू शकलो असतो. परंतु मी तसे केलं नसल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप ठाकरे गटाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे.